खंडेरायाच्या लग्नाला' गाण्यामुळे प्रसिद्ध झालेल्या छगन चौगुलेंचे निधन

मुंबई :लोककलावंत छगन चौगुले यांचे निधन झाले आहे. मृत्यूसमयी त्यांचे वय 81 वर्षे इतके होते. 'खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली' या गाण्यामुळे छगन चौगुले हे संपूर्ण राज्यात प्रसिद्ध झाले होते.

हे गाणं आजही प्रचंड प्रसिद्ध आहे. चौगुले हे उत्तम लोककलावंत होते. त्यांनी लोककलेचे विशेष असे कोणतेही प्रशिक्षण घेतले नव्हते. पहाडी आवाजामुळे आणि संगीताची जाण असल्याने ते अल्पावधीत प्रसिद्ध झाले होते. चौगुले हे गोंधळी होते. मात्र त्यांनी आपली कला गोंधळाच्या कार्यक्रमांपुरता मर्यादीत न ठेवता गात्या गळ्याला आणि स्वत:कडे असलेल्या कलेला विकसित केले. त्यांच्या निधनाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना 'महाराष्ट्राने एक हाडाचा लोककलावंत गमावला अशी प्रतिक्रिया गायक, लोककलावंत गणेश चंदनशिवे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे. चौगुले यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. यामुळे त्यांना मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

लोककलावंत छगन चौगुले यांची लोकगीतं हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा!

लोककलावंत छगन चौगुले यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. महाराष्ट्रातील लोकगीतं, लोककला, लोकसंस्कृतीच्या प्रचार, प्रसारसाठी छगनांनी दिलेलं योगदान कायम स्मरणात राहील. छगनांनी सांगितलेल्या देवदेवतांच्या कथा, गायलेली कुलदेवतांची गाणी हा महाराष्ट्राचा सांस्कृतिक ठेवा आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

लोक कलावंत छगन चौगुले यांना श्रद्धांजली वाहताना उपमुख्यमंत्री म्हणाले की, छगनांची गाणी ही महाराष्ट्रात विशेषत: ग्रामीण भागात कायम प्रचंड लोकप्रिय ठरली आहेत. बारामती, पुण्यासह राज्यात सर्वत्र त्यांचा स्वत:चा रसिकवर्ग आहे. 'खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली' या गाण्यानं त्यांना नवी ओळख दिली असली तरी 'कथा चांगुणाची', 'कथा श्रावण बाळाची' आईचे काळीज', 'अंबाबाई कथा : कथा तुळजापुरची भवानी', 'कथा देवतारी बाळूमामा' सारख्या गीतसंग्रहांमुळे ते आधीपासूनच महाराष्ट्राच्या घराघरात पोहचले आहेत. मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीच्या माध्यमातून त्यांनी लोककलांचा अभ्यास करणारे अनेक विद्यार्थी घडवले. जागरण गोंधळीसारखी लोककला विद्यार्थ्यां पर्यंत, नवीन पिढीपर्यंत यशस्वीपणे पोहचवली. छगन चौगुले यांच्या निधनानं महाराष्ट्राच्या लोककला जगताची, सांस्कृतिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट