
भाजप नेत्याचा वानखेडे स्टेडियम कोरोना उपचार केंद्राला कडाडून विरोध
- by Adarsh Maharashtra
- May 17, 2020
- 1012 views
मुंबई : कुलाब्याचे माजी आमदार राज पुरोहित यांनी वानखेडे स्टेडियमवर कोरोना उपचार केंद्र, विलगीकरण कक्ष स्थापन करण्यास कडाडून विरोध केला आहे. मुंबई महापालिकेच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन करू असा इशारा राज पुरोहित यांनी दिला आहे.
महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. राज्यात सर्वाधिक रुग्ण मुंबईत आहेत. या पार्श्वभूमीवर बृहृन्मुंबई महानगरपालिकेने मुंबई क्रिकेट असोसिएशनला प्रसिद्ध वानखेडे स्टेडियम ताब्यात देण्याची विनंती केली आहे. यासंदर्भात बीएमसीने एमसीएला एक पत्र पाठवले आहे. क्वारंटाइन सेंटरसाठी स्टेडियम उपलब्ध करुन देण्यास एमसीएने तयारी दर्शवली आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधित रुग्णांसाठी वानखेडे स्टेडियमचं 'क्वारंटाइन सेंटर'मध्ये रुपांतर करण्यात येणार आहे. मात्र, आता भाजपच्या नेत्याने याला विरोध केला आहे.
वानखेडे स्टेडियमचं 'क्वारंटाइन सेंटर' करण्याच्या मुंबई महापालिकेच्या या निर्णयाला स्थानिक नागरिकांचा विरोध असल्याचा दावा राज पुरोहित यांनी केला आहे. याबाबत राज पुरोहित यांनी मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांना पत्र लिहिलं आहे.
स्टेडियमच्या आसपासचा परिसर हे व्यावसायिक केंद्र आहे. त्यामुळे इथे कोरोना उपचार केंद्र किंवा विलगीकरण कक्ष सुरु करण्यात येऊ नये, अशी मागणी पुरोहित यांनी केली आहे.
दुसरीकडे, एमसीए सचिव संजय नाइक यांनी सांगितलं की, वानखेडे स्टेडियमला क्वारंटाइन सेंटर करण्याबाबत बीएमसीचं पत्र मिळालं आहे. संकटाकात स्टेडियम उपलब्ध करुन देण्यास एमसीएनं तयारी दर्शवली आहे.
दरम्यान, याआधी एमसीएने कोरोनाविरुद्ध लढ्यात मुख्यमंत्री व पंतप्रधान सहायता निधीला 50 लाखांची आर्थिक मदत दिली होती. याचसोबत गरज लागल्यास आपल्या अखत्यारीत असणारी स्टेडियम क्वारंटाइन सुविधेसाठी देण्याचीही तयारी दर्शवली होती.
याबरोबरच मुंबईतील कोरोना बाधित रुग्णांच्या सेवेसाठी विविध ठिकाणी क्वारंटाइन सुविधा तयार करण्यात येत आहेत. गोरेगावमध्ये नेस्को कॉम्प्लेक्स परिसरात काही दिवसांपूर्वी 1000 पेक्षा अधिक रुग्णक्षमता असलेल्या क्वारंटाइन सुविधेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट दिली होती.
याव्यतिरीक्त BKC आणि ठाणे अशा 3 ठिकाणी क्वारंटाइन सुविधा तयार करण्यात आलेली आहे. मात्र, दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत होत असलेली वाढ लक्षात घेता महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून वानखेडे स्टेडियम ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम