
सरकारी रुग्णालयातील गैरहजर राहणाऱ्या डॉक्टरांना नोटीसा-महापौर किशोरी पेडणेकर
- by Adarsh Maharashtra
- May 13, 2020
- 537 views
मुंबई:कोरोनाच्या संकटकाळात मुंबईतील पालिका रुग्णालयांमध्ये गैरहजर राहत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशासनाकडून नोटीस पाठवण्यात येणार आहेत. महापौर किशोरी पेडणेकर यांनी मंगळवारी यासंदर्भातील आदेश काढले. त्यानुसार कायमस्वरूपी पदावरील डॉक्टर, परिचारिका तसेच चतुर्थश्रेणी पदावरील कर्मचारी वारंवार अनुपस्थित राहत असलेल्या कर्मचाऱ्यांना तात्काळ नोटीस धाडण्यात येईल. त्यामुळे आता कामचुकार कर्मचाऱ्यांची पाचावर धारण बसली आहे.
दरम्यान,मंगळवार घेतलेल्या बैठकीत महापौर किशोर पेडणेकर यांनी प्रमुख रुग्णालयातील कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला.या आढावा बैठकीस रूग्णालयांचे डीन, वैद्यकीय अधिक्षक तसेच आरोग्य विभागातील अधिकारी उपस्थित होते. गेल्या काही दिवसांमध्ये पालिकेच्या केईएम आणि सायन या रुग्णालयांमधील यंत्रणेवर प्रचंड ताण पडत असल्याचे प्रसंग समोर आले होते. या रुग्णालयांमध्ये कोरोना वॉर्डातील मृतदेह हलवण्यास विलंब लागत होता. त्यामुळे या मृतदेहांशेजारीच कोरोनाच्या इतर रुग्णांवर उपचार सुरु असल्याच्या खळबळजनक क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. या प्रकाराची पालिका प्रशासन आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली होती.
सध्याच्या घडीला देशभरात मुंबईत कोरोनाच्या सर्वाधिक चाचण्या होत आहेत. पालिका प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत आहे. तरीही शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. मुंबईतील कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या धारावीत मंगळवारी ४६ नवे रुग्ण आढळून आले. तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. त्यामुळे धारावीतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ९६२ इतकी झाली आहे. पालिका प्रशासनाच्या अपयशामुळे मुंबईचे आयुक्त प्रवीण परदेशी यांची पदावरुन उचलबांगडी करण्यात आली होती. यानंतर तरी मुंबईतील परिस्थितीत फरक पडणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम