मुंबईत असंच सुरु राहीलं, तर आर्मी बोलवावी लागेल, मग नागरिकांच्या अडचणी वाढतील -किशोरी पेडणेकर

मुंबई :-कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुंबईकरांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. कोरोना नियंत्रणासाठी आवश्यक सर्व नियम पाळा. निर्बंधांचं पालन करा आणि घरातच राहा. अन्यथा नाईलाजाने मिलिट्रीला बोलवावं लागलं, तर नागरिकांच्याच अडचणी वाढतील, असं मत किशोरी पेडणेकर यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना उपचाराच्या नावाखाली सुरु असणाऱ्या लुटीवरही नाराजी व्यक्त केली. कोरोनावर औषधही नसताना खासगी रुग्णालयं 6 लाख रुपये बील घेत असतील तर ते चुकीचं आहे असं त्या म्हणाल्या.

किशोरी पेडणेकर म्हणाल्या, 'आव्हान मोठं आहे, मात्र नागरिकांना साथ दिली तर त्या आव्हानाला आपली यंत्रणा यशस्वीपणे सामोरे जाईल.नागरिकांनी कोणत्याही कारणासाठी घराबाहेर पडू नये. आज सायंकाळपासून काटेकोर निर्बंध लावले जाणार आहेत. जर आपल्याला काही कारणाने मिलिट्रीला बोलवावं लागलं तर अडचणी वाढतील. आत्ता तरी काही प्रमाणात बाहेर जाता येत आहे, जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता येत आहे. मात्र, मिलिट्री आल्यावर या सर्व सोयी सुविधा बंद होईल. मिलिट्री कुणाचंही ऐकणार नाही. म्हणूनच नागरिकांनी एकमेकांना समजून घ्यावं आणि त्या पद्धतीने वागावं.'आम्ही जेव्हा नगरसेवकांशी बोललो तेव्हा लोक ऐकत नाहीत अशा तक्रारी आहेत. हे बरोबर आहे की काही धार्मिक सण येतात म्हणून थोडं बाहेर पडावं लागतं, मात्र अशा लोकांनी बाहेर येऊन स्वतः कोरोनाचा संसर्ग घेणे किंवा इतरांना संसर्गित करणं या दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत. मला वाटतं सर्वांनी यावर नियंत्रण आणलं पाहिजे. यात कुणीही जात, धर्म, पंत पाहू नये. सर्वांनी माणूस म्हणून एकमेकांकडे पाहावं. या परिस्थितीत आपला जीव वाचवणं हेच आपल्यासमोरील आव्हान आहे, असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांची लूट'

किशोरी पेडणेकर म्हणाल्या, 'कोरोनावर अजून कोणतंही औषध नाही, तर खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांचे 6 लाख रुपये बील होत आहे. यात आपण वैद्यकीय कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पीपीई किट्स, मास्क वगैरे गोष्टींचा भाग समजू शकतो. मात्र, हे बिलाची रक्कम खूप जास्त आहे. तुम्ही 51 हजार किंवा 1 लाख असं पॅकेज करा. ज्यांना चांगल्या ठिकाणी राहायचं आहे ते तिथं जाऊ शकतात. मात्र, कोरोना रुग्णांकडून 5 ते 6 लाख रुपये घेणे चुकीचं आहे. रुग्णालयांमध्ये किती आणि कोणते बेड रिकामे आहेत हे समजत नाही. ते रुग्णांच्या नातेवाईकांना कळावे म्हणून आपण यासाठी एक यंत्रणा करत आहोत.'

मुंबईतील खासगी कोविड रुग्णालयांमधील 20 ते 50 टक्के खाटा पालिका आपल्या ताब्यात घेणार आहे. काही खासगी रुग्णालयं मनमानी करतात. अव्वाच्या सव्वा बील करतात. महापालिका ही रुग्णालयं ताब्यात घेणार आहे. या ठिकाणांवरील रुग्णांवर मोफत उपचार होतील. या उपचारांचा खर्च पालिका करणार असून त्यासाठी आरोग्य विमा योजनेनुसार दर देण्यात येतील. आता खासगी रुग्णालयांची मनमानी चालणार नाही, असंही त्या म्हणाल्या.तसेच मुंबई बाहेरच्या सीमा सील करण्याचा विचार हा अमानवीय आहे. असं होता कामा नये. सगळ्यांनी एकमेकांना समजून घ्यावं, अशीही भावना पेडणेकर यांनी व्यक्त केली.

मुंबईतील झोपडपट्ट्यांबाबत वेगळा विचार'

किशोरी पेडणेकर म्हणाल्या, 'मुंबईतील झोपडपट्ट्यांबाबत आम्ही वेगळा विचार करत आहोत. या दाटीवाटीच्या वस्त्यांमध्ये कोरोना रुग्ण आढळल्यास त्यांच्या कुटुंबीयांना देखील क्वारंटाईन केलं जात आहे. यासाठी जागाही शोधल्या जात आहेत. मैदानं, शाळा किंवा इतर इमारतींचा यासाठी विचार सुरु आहे. झोपडपट्ट्यांमधील सार्वजनिक शौचालयं देखील निर्जंतुvकीकरण करण्याचं काम केलं जात आहे. काही ठिकाणी 20 खोल्यांसाठी एकच शौचालयाची व्यवस्था आहे. अशा ठिकाणी जागेच्या उपलब्धतेनुसार नवी शौचालये बांधण्याचंही काम केलं जाणार आहे. घरोघरी नागरिकांच्या तपासण्या देखील केल्या जात आहेत.'

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट