मुंबईत ७६२ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले!

सलग दुसर्‍या दिवशी घट - नव्या २८१ कोरोनाबाधितांची नोंद

मुंबई, दि. २५ (प्रतिनिधी) - मुंबईत कोरोनोविरोधात सुरू असलेल्या लढ्याला आता चांगलेच यश येऊ लागले असून आतापर्यंत तब्बल ७६२ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. विशेष म्हणजे मुंबईत सलग दुसर्‍या दिवशी कोरोनाबाधितांची संख्या घटली असून गेल्या २४ तासांत २८१ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. काल २४ एप्रिल रोजी नोंद झालेल्या ३५७ रुग्णांच्या तुलनेत आज ७६ रुग्ण घटले आहेत.  शिवाय एकाच दिवसांत १६७ जण कोरोनामुक्त झाले.

मुंबईत पाचशेपार गेलेला कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा कालपासून घटू लागल्याने मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयासह इतर रुग्णालये आणि खासगी हॉस्पिटल्स, प्रयोगशाळांमध्ये केलेल्या ३५७ कोरोना संशयितांच्या चाचण्यांमधून आलेल्या अहवालानुसार ही आकडेवारी जाहीर करीत असल्याचे पालिकेने म्हटले आहे. आज २८१ नव्या रुग्णांची नोंद झाल्यामुळे आता मुंबईतील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४८७० वर पोहोचली आहे. आज जाहीर केलेल्या आकडेवारीत २२ एप्रिल रोजीच्या ७८ चाचण्यांचा समावेश असल्याचेही पालिकेने स्पष्ट केले आहे.

बारा जणांच्या मृत्यू

मुंबईत आज विविध रुग्णालयांमध्ये १२ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये नऊ पुरुष तर तीन महिला होत्या. तर १२ पैकी सात जणांना दीर्घकालीन आजार होते. शिवाय ११ जण ४० ते ७० वयोगटातील आणि एक जण ४० वर्षांपेक्षा कमी वयाचा होता. आजच्या १२ मृत्यूंमुळे  आतापर्यंतच्या मृतांचा आकडा १९१ वर पोहोचला आहे.

धारावीचा आकडा २४१ वर पोहोचला

धारावीत गेल्या २४ तासात कोरोनाचे २१ नवे रुग्ण सापडले असून कोरोना रुग्णांची संख्या २४१ वर पोहोचली आहे तर आतापर्यंत १४ जणांचा मृत्यू झाला आहे. आज सापडलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये १० महिलांचा समावेश आहे. धारावी कोळीवाड्यात दोन महिला, मुकुंदनगरमध्ये दोन महिला -१ पुरुष, ६० फुट रस्ता परिसरात दोन महिला-१ पुरुष, शांती शिवन सोसायटी १ महिला, कुंचिकुरवेनगरमध्ये १ पुरुष, इंदिरानगरमध्ये ४ पुरुष, कल्पतरू सोसायटी १ महिला, कल्याणवाडी एक पुरुष, १ महिला, सोशल नगर २ पुरुष, राजीव गांधी नगर १ पुरुष आणि माटुंगा लेबर कॅम्पमधील एका महिलेला कोरोनाची लागण झाली आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट