शिराळा तालुक्यात पहिला कोरोना रूग्ण

शिराळा :(आनंद बेगंडे) संचारबंदीत अत्यावश्यक सेवेचा गैरवापर करुन मुंबईतून सांगलीत आणलेल्या तरुणीला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. 16 एप्रिल रोजी या तरुणीला तिच्या भावासह मुंबईहून शिराळा तालुक्यातील निगडी खुर्द गावात आणले होते. पोलिसांनी या प्रकरणी कोरोनाग्रस्त रुग्णासह पाच जणांविरोधात शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान या तरुणीच्या भावाचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे.

निगडी येथील प्रदीप पाटील यांनी आपल्या चुलतीला कॅन्सरच्या उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात अॅडमिट करण्यासाठी सांगली पोलीस अधीक्षक यांच्याकडे ऑनलाईन पासची मागणी केली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी प्रदीप पाटील, गणपती भालेकर आणि वाहन चालक संतोष साळुंखे यांना पास दिले होते. 16 एप्रिल रोजी त्यांनी कॅन्सर हॉस्पिटलमध्ये चुलतीला पोहोचवले आणि गावी परतत असताना, मुंबईत असणाऱ्या निगडी गावातील तरुणी आणि तिच्या भावाला संचारबंदीतही आपल्या गाडीतून घेऊन आले.

यानंतर गुरुवारी मुंबईहून आलेल्या तरुणीची कोरोनाची लक्षणे आढळल्याने तिला आणि तिच्या भावाला इस्लामपूरमध्ये क्वॉरन्टाईन करुन त्यांची स्वॅब टेस्ट घेण्यात आली होती. 24 एप्रिल रोजी तरुणीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. यानंतर प्रशासनाची धावपळ उडाली. दोघा बहीण-भावांना मिरजेच्या कोरोना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

मात्र संचारबंदीमुळे जिल्ह्यात प्रवेश बंद असताना, बहिण-भाऊ हे दोघे मुंबईवरुन गावात पोहोचले कसे? हा मोठा प्रश्न उपस्थित झाला होता. यानंतर पोलिसांनी तपास केला असता प्रदीप पाटील, गणपती भालेराव यांच्या गाडीतून ते मुंबईहून परत आल्याचे समोर आले आहे. यानंतर पोलिसांनी गणपती भालेराव, चालक संतोष साळुंखे, प्रदीप पाटील यांच्यासह कोरोनाग्रस्त तरुणी आणि तिचा भाऊ अशा पाच जणांविरोधात कलम 188, 269, 270, 34, राष्ट्रीय अपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 (ब) आणि कोविड 19 उपाय 2020 कलम 11 याप्रमाणे शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहेत.

अधिक तपास शिराळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विशाल पाटील, उपनिरीक्षक सुप्रिया दुरंदे, तहसिलदार गणेश शिंदे, गोपनीय अधिकारी विनोद पाटीलसह पोलीस प्रशासन, वैद्यकीय अधिकारी करत आहेत.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट