
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मौन सोडलं; म्हणाले, महाराष्ट्रासाठी मी वाईटपणा घ्यायला तयार
- by Adarsh Maharashtra
- Apr 19, 2020
- 1180 views
मुंबई :राज्यातील काही भागात करोनाची स्थिती गंभीर असताना राजकीय पटलावर आरोप प्रत्यारोपही जोरात सुरू आहेत. करोनाचा प्रसार रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप सातत्यानं विरोधकांकडून केला जात आहे. त्याचबरोबर मंत्रिमंडळामध्ये समन्वय नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. वांद्रेतील घटनेनंतरही मुख्यमंत्र्यांवर टीका झाली होती. वेगवेगळ्या मुद्यांवरून होत असलेल्या आरोपांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुणाचाही नामोल्लेख न करता उत्तर दिलं.
राज्यात आगामी काळात सुरू करण्यात येणाऱ्या उद्योगांबरोबर सध्याच्या परिस्थितीविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी महाराष्ट्राच्या जनतेला संबोधित केलं.'आपण संयम, धैर्य, जिद्दीने लढत आहोत. न दिसणाऱ्या शत्रूशी आपला लढा सुरू आहे. आपल्या माणसांच्या माध्यमातून हा शत्रू आपल्यावर हल्ला करतोय. त्यामुळे सर्दी, खोकला, ताप अशी कोणतीही लक्षणं लपवू नका. कोणी आपल्याला वाळीत टाकण्याची भीती बाळगू नका. घरी उपचार करु नका. फीव्हर क्लिनिकला भेट द्या. करोना झाला म्हणजे सगळे संपलं असं नाही. वेळेत आलेले रूग्ण बरे झाले आहेत. महाराष्ट्रात करोनाचा रुग्ण सापडला त्याला सहा आठवडे होत आले आहेत.काल संध्याकाळपर्यंत राज्यात ६६ हजार ७९६ टेस्ट करण्यात आल्या. ९५ टक्के निगेटिव्ह रुग्ण आहेत. ३,६०० जणांना लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे, तर ३५० जण आतापर्यंत बरे होऊन घरी गेले आहेत,' अशी माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली.
'राज्य सरकारकडून केली जाणारी कामं, उपाययोजना काही जणांच्या मनासारखं होत आहेत. ज्यांच्या मनासारखं होत आहेत, ते आशीर्वाद देत आहेत. माझं कौतुक करत आहेत. उद्धवजी चांगलं काम करत आहेत, असं ते म्हणत आहेत. मात्र, काही जणांच्या मनासारखं होत नाहीय. साहजिकच आहे ते थोडेसे माझ्यावरती रागावले आहेत. पत्रकारांना विनंती आहे, की वृत्तपत्रांवर बंदी नाही. पेपर स्टॉलवर उपलब्ध करून द्यायला हरकत नाही. पण, मुंबई, पुण्यासारख्या ठिकाणी घरोघरी वृत्तपत्र टाकू देणं मला योग्य वाटत नाही. मला कुणाशी वाद नाही करायचा. माझी भीती अनाठायी असेल. मला कुणी वाईट म्हणतील. तर मी महाराष्ट्रासाठी वाईटपणा घ्यायला तयार आहे. कौतुकाबरोबर वाईटपणा घ्यायला तयार आहे. असं उद्धव ठाकरे म्हणाले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम