मुंबईत दररोज सुमारे ४ लाख ६१ हजार तयार जेवण पाकिटांचा विस्थापित, कष्टकरी कामगारांना विनामूल्य पुरवठा
कोणत्याही समस्येसाठी महापालिकेच्या टोल फ्री नंबरवर संपर्क साधण्याचे महापौरांचे आवाहन
- by Adarsh Maharashtra
- Apr 18, 2020
- 797 views
मुंबई -कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर, सध्या लागू असलेल्या संचारबंदीमुळे मुंबईत अडकलेल्या विस्थापित, कष्टकरी कामगारांसाठी मुंबई महानगरपालिकेने आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व २४ विभागांमध्ये मिळून ७३४ मोफत जेवण वाटप केंद्र कार्यान्वित केली आहेत. त्या माध्यमातून दररोज दोनवेळची मिळून सुमारे ४ लाख ६१ हजार इतकी तयार जेवणाची पाकिटे गरजूंना विनामूल्य पुरविली जात आहेत.
दरम्यान, आवश्यकता असल्यास संबंधितांनी हेल्पलाईन क्रमांक १८००-२२१२९२ यावर संपर्क साधावा, त्यानुसार त्यांना मदत पुरविली जाईल, असे आवाहन मुंबईच्या महापौर श्रीमती किशोरी किशोर पेडणेकर यांनी केले आहे.
कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी निरनिराळ्या व्यापक उपाययोजना मुंबई महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येत आहेत. लॉकडाऊनच्या काळात वेगवेगळ्या समाजघटकांच्या गरजा लक्षात घेऊन सर्वांच्या सहकार्याने कामे केली जात आहेत. आर्थिक राजधानी मुंबईमध्ये मोठ्या संख्येने कामगार, मजूर, विस्थापित वास्तव्यास आहेत. या विस्थापित व कष्टकरी तसेच लॉकडाऊनच्या काळात मुंबईत अडकलेल्या गरजू व्यक्तिंसाठी दोनवेळचे तयार जेवण पुरविण्याचे काम दिनांक २८ मार्च २०२० पासून सातत्याने केले जात आहे. मुंबईतील विविध लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार, संबंधित स्थानिक नगरसेवक यांच्या सहकार्याने समन्वय साधून अन्नाचे वितरण करण्यात येत आहे.
या वितरण केंद्रांच्या माध्यमातून प्रारंभी, रस्त्यावर राहणाऱया, बेघर व्यक्तिंना जेवण देण्यात येत होते. तथापि, विस्थापित व कष्टकरी, कामगार, मजूर अशा सगळ्यांची गरज लक्षात घेता या कामाची व्याप्ती वाढविण्यात आली आहे. आजमितीस दोनवेळची मिळून सुमारे ४ लाख ६१ हजार १०० इतकी तयार जेवणाची पाकिटे विनामूल्य पुरविली जात आहेत. त्यासाठी वेगवेगळ्या कम्युनिटी किचन्सच्या माध्यमातून जेवण तयार केले जाते. बेस्ट प्रशासनाच्या ४८ वातानुकूलित बसेसद्वारे मुंबईतील २४ विभाग कार्यालयांच्या क्षेत्रात एकूण ७३४ केंद्रांवर हे जेवण पोहोचविले जाते. दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत अशा दोनवेळेस सर्व गरजूंना विनामूल्य तयार जेवण पुरविले जात आहे. या सर्व कामांमध्ये बिगर शासकीय संस्था, सेवाभावी संस्था व व्यक्ती, बचतगट यांचेही सहकार्य मिळत आहे.
याउपक्रम अंतर्गत आवश्यक असल्यास मदत दूरध्वनी क्रमांक १८००-२२१२९२ या क्रमांकावर संपर्क साधल्यास संबंधित गरजूंना जेवण पोहोचविण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे

रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम