
मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट
- by Adarsh Maharashtra
- Apr 16, 2020
- 492 views
मुंबई : कोरोनाबाधित आणि त्यामुळे मृत्यूच्या प्रमाणात उत्तरोत्तर वाढ होत असताना गेल्या तीन दिवसात बाधितांच्या संख्येत होणारी घट ही मुंबईकरांसाठी निश्चितच दिलासादायक आहे.
राज्यात ७ एप्रिलला १५० रुग्ण सापडले होते. त्यापैकी मुंबईत १०० होते. तेथून बाधितांचा आलेख वाढताच होता. ११ आणि १२ एप्रिल रोजी मुंबईत २०० च्या आसपास रुग्ण होते. मात्र १३ एप्रिल रोजी हीच संख्या १५० पर्यंत खाली आली. १४ एप्रिल रोजी पुन्हा २०४ पर्यंत बाधित झाले. तर १५ एप्रिलला बाधितांची संख्या १८३ पर्यंत खाली आली. बाधित रुग्णांचा घटता आलेख लक्षात घेता डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांबरोबरच पोलिसांसह समाजातील सर्व स्तराच्या प्रयत्नांना येत असलेले हे यश असल्याचे मानण्यात येत आहे.
महापालिकेच्या आरोग्य खात्याने या आठवड्यात चाचणीची पद्धत बदलली आहे. त्याचेच हे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. गेले तीन दिवस ११ ते १५ दरम्यान असलेली मृतांची संख्या बुधवारी दोन पर्यंत खाली आली आहे. मुंबईत आतापर्यंत १९३६ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले असून त्यापैकी ११४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १८१ बरे होऊन घरी परतले आहेत.
मुंबईत मरण पावलेल्या रुग्णांपैकी अनेक जण जेष्ठ नागरिक आहेत आणि त्यांना इतर आजारही होते, असे दिसून येत आहे. शिवाय दिल्लीतील निजामुद्दीन येथे मरकजला जाऊन आलेल्या तबलिगींच्या संपर्कात आल्याने अनेकांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधााठी पालिका प्रशासनाची लढाई योग्य मार्गानेच चालल्याचे सिद्ध होत आहे.
शोध मोहिमेमुळे यश
कोरोना संसर्गित व्यक्ती स्वतःहून पालिकेकडे येईल आणि त्याच्यावर उपचार करण्यात येतील एवढ्यावरच पालिका प्रशासन थांबले नाही. तर रुग्णांचा आकडा वाढत जाताच त्यांच्या संपर्कात आलेल्यांची शोधमोहीम पालिकेने हाती घेतली आणि त्यांना क्वारंटाईन केले. त्यामुळे रुग्णांच्या वाढत्या संख्येला आळा बसल्याचे दिसत आहेत.
अनुभवी सनदी अधिकाऱ्यांमुळे पालिकेच्या उपचारांना मार्गदर्शन
मुंबईतील कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता पालिकेचा नियंत्रण कक्ष अधिक सक्षम करण्यात आला. पालिका सनदी अधिकाऱ्यांच्या जोडीला समन्वयक म्हणून अश्विनी भिडे, एन. रामास्वामी आणि मनीषा म्हैसकर यांना सरकारने प्रतिनियुक्तीवर पाठवले. म्हैसकर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त असताना २०१० मध्ये मुंबईतील मलेरियामुळे निर्माण झालेली भयाण परिस्थिती नियंत्रणात आणण्याची महत्त्वाची भूमिका बजावली होती. तो अनुभव गाठीशी असल्याने कोरोना प्रतिबंधाची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली. कोरोना संसर्गाशी मुकाबला करण्यासाठी मुंबई पालिकेत आठ सनदी अधिकाऱ्यांची टीम असल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली आता चांगले परिणाम जाणवू लागले आहेत.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम