
अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यालाच पोलीसी दंडुक्याचा प्रसाद
- by Adarsh Maharashtra
- Apr 05, 2020
- 1160 views
मुंबई : कोरोनाच्या विरोधात मुंबई पोलिसांनी कंबर कसली असून कोरोना रुग्णांची लागण अन्य कोणालाही होऊ नये यासाठी रस्त्यावरील गदी टाळण्यासाठी पोलीस डोळ्यात तेल घालून आपली जबाबदारी पार पाडत आहेत. पोलिसांचे हे कर्तव्य पाहुन सर्वांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे. मात्र कुर्ला नेहरु नगर येथे अत्यावश्यक सेवा बजावून घरी जात असताना पोलिसांनी त्या कर्मचाऱ्याला पोलीसी दंडुक्याचा प्रसाद दिल्याचा प्रकार समोर आला आहे. बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागात बेस्ट बसवर वाहक म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्याबरोबर हा प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. धारावी बस आगारात वाहक म्हणून अब्दुल कादीर मेहबूब दरजी काम करतात. शुक्रवारी रात्री उशीरा काम संपवून धारावी बस आगारातून घरी जाण्यासाठी निघालो. कुर्ला पूर्व नेहरु नगर येथील सिग्नलजवळ पोलीस बंदोबस्त सुरु होता. परंतु मला काही न विचारता एका पोलीस हवालदाराने पायावर जोरात काठी मारली. काही कळायच्या आत पुन्हा मारण्यास सुरुवात केली, असा आरोप केल्याचे अब्दुल कादीर यांनी सांगितले.
कोरोना वायरसची लागण झालेल्या रुग्णांना वाचवण्यासाठी डाॅक्टर, परिचारिकेसह रुग्णालय प्रशासन रात्र दिवस काम करत आहे. तर अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्यांना ऑफिस अथवा घरी सोडण्याची जबाबदारी बेस्ट परिवहन विभागातील वाहक व चालक पार पाडत आहेत. कोरोना विरोधात लढा देण्यासाठी सगळेच एकत्र आले आहेत. परंतु अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्यांवरच पोलीस बळाचा वापर करत असतील, तर कोण घराबाहेर पडेल, असा सवाल कादीर यांनी उपस्थित केला आहे.
काही ठिकाणी पोलीस कठोर भूमिका घेत असल्याने त्यांच्यावर हल्ला झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. मात्र अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्यांवरच पोलीस बरसत असतील तर अशा लोकांचे खच्चीकरण होईल, असे मत बेस्ट उपक्रमातील अधिकारी व्यक्त करत आहेत.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम