
संकटात संधी शोधू नका, मुख्यमंत्र्यांचा साठेबाजाना इशारा
जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक सुरुच राहण्याची दिली ग्वाही
- by Adarsh Maharashtra
- Mar 24, 2020
- 790 views
मुंबई : कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर कुणीही काळाबाजार करू नये, साठा करू नये, या संकटाचा संधी म्हणून उपयोग करू नये असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला. तसेच आज पोलीसांनी धाड टाकून मास्कच्या असलेला काळाबाजार उघडकीस आणला, त्याबद्दल पोलीसांचे कौतुक केले. भविष्यात ही अशा प्रकारांवर याचप्रकारे कारवाई व्हावी अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या. लाईव्ह प्रसारणाच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी आज जनतेशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.
केंद्र सरकारचे आभार
राज्य शासनाच्या विनंतीवरुन केंद्र सरकारने देशांतर्गत विमान सेवा आज मध्यरात्री पासून बंद केल्याबद्दल, जीएसटी रिर्टन दाखल करण्यास मुदतवाढ दिल्याबद्दल तसेच विषाणुच्या चाचणीसाठी प्रयोगशाळांची संख्या वाढवल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारला धन्यवाद दिले.
जगणे थांबवले नाही, जीवनशैली बदलली
आपल्याकडे राज्यात अन्नधान्याचा पुरसा साठा उपलब्ध आहे. त्याची वाहतूक आणि वितरण व्यवस्था सुरळित ठेवण्याच्या सूचना आज पुन्हा दिल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, शेतकरी, शेतमजूर यांना शेतात जाण्यास, काम करण्यास मनाई नाही. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक आपण थांबवलेली नाही. शेतमालाची वाहतूक करण्यास बंदी केलेली नाही. जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा सुरळित राहावा यासाठी ही उत्पादने तयार करणाऱ्या कारखान्यांवर, कंपन्यांवर आपण बंदी घातलेली नाही. ज्या कंपन्या अशा प्रकारे जीवनावश्यक वस्तुंचे उत्पादन करतात त्यांनी आपल्या वाहनांवर कंपनीचे नाव, उत्पादन, कर्मचारी यांची माहिती देणारे ओळखपत्र लावावे, त्यांना वाहतूकीत कुठेही अडवले जाणार नाही हेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. आपण जगणे थांबवले नाही तर जीवनशैली बदलली असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.
मदतीचे अनेक हात पुढे
अनेक स्वंयसेवी संस्था, शिर्डीचे साई संस्थान, सिद्धीविनायक मंदिरन्यास, स्वंयसेवी संस्थांकडेून मदतीचे हात पुढे येत असल्याचा मुख्यमंत्र्यांनी आजच्या संवादात आवर्जुन उल्लेख केला. त्यांना धन्यवाद दिले. हे रक्तदान करण्याचे दिवस आहेत. अशा काळात अनेक रक्तदान शिबीरे होतात, सध्याच्या परिस्थितीत रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन लालबागचा राजा मंडळाने पुढे येऊन रक्तदान शिबीरे आयोजित करण्यासारखा अनोखा कार्यक्रम केला. अशाप्रकारे योग्य ती सर्व काळजी घेऊन इतर संस्थाही रक्तदान शिबीरांचे आयोजन करावे असे मुख्यमंत्री म्हणाले.
विषाणुला जिथे आहे तिथेच संपवायचे
पोलीस जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक रोखत आहेत, भाजी आणि दुध आणायलाही बाहेर जाऊ देत नाही अशा काही तक्रारी आल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, हे संकट गांभीर्याने घेण्याची गरज आहे. या विषाणुचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून आपण जिल्ह्यांच्या सीमा सील केल्या आहेत. आतापर्यंत जिथे विषाणुचा प्रादुर्भाव झाला नाही तिथे तो पोहोचू नये, म्हणून हा निर्णय घेतला आहे. विषाणूला आपल्याला आहे तिथेच पुर्ण शक्तीने संपवायचे आहे. आपण जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक बंद केलेली नाही खरेदीसाठी बाहेर पडणे ही बंद केलेल नाही. परंतू प्रत्येकाने समजूतदारपणा दाखवण्याची गरज आहे. कुणीही जीवनावश्यक वस्तुंची खरेदी करण्यासाठी बाहेर पडायचे आणि विनाकारण फिरत बसायचे असे करू नये, घरातच राहावे आणि सुरक्षित राहावे असे आवाहनही त्यांनी केले.
100 नंबरवर फोन करा
जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक, कंपन्या, कारखाने, बँका बंद नाहीत. येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी अडचणी येत असतील तर त्यांनी 100 नंबरवर फोन करून पोलीसांची मदत घ्यावी, पोलीस त्यांना नक्की मदत करतील. जी माणसं धान्य, औषधं आणि इतर जीवनावश्यक वस्तुच्या खरेदीसाठी बाहेर जातील त्यांनी पोलीसांना हीच खरेदी करण्यासाठी बाहेर पडल्याची खात्री पटवून दयावी, पोलीसांना यासाठी त्यांना परवानगी देण्याच्या सुचना दिल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम