
खासगी प्रवासी वाहतूक उद्योगाला वाचवा; विविध वाहतूकदार संघटनांची शासनाकडे आर्जव मागणी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली वाहतूक सेवा पूर्ववत होईपर्यंत मोफत पार्किंग सुविधा, पुढील ३ महिन्यांसाठी वाहन-रस्ते करात सूट, वस्तु सेवाकरात सवलत देण्याची प्रशासनाकडे विनंती
- by Adarsh Maharashtra
- Mar 19, 2020
- 1970 views
मुंबई(प्रतिनिधी): जागतिक भीषण आरोग्य समस्या बनलेल्या कोरोना विषाणूचा प्रसार-प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरात विविध उपाययोजना राबविण्यात येत असताना जमावबंदीचे आदेश लागू करत खासगी टुर बंद करण्याच्या सूचना प्रशासनाद्वारे सर्व वाहतूक व्यवसायिकांना देण्यात आल्या आहेत. परिणामी खासगी वाहतूक मंदावली असून मुंबई महानगर प्रदेशातील एकूण बस संख्येपैकी केवळ २५ टक्के बस वाहने सध्या रस्त्यावर धावत आहेत. तर एकूण राज्याची परिस्थितीचा आढावा घेतला असता खासगी बस प्रवाशांची संख्या ६० हजारांवरून थेट १० ते १२ हजारांवर घसरली आहे. परिणामी मुंबईतील खासगी वाहतुकीला रोज सुमारे १५० कोटींचा आर्थिक फटका बसत असल्याचा दावा करत बस एण्ड कार ऑपरेटर्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि मुंबई बस मालक संघटनेने पुढील ३ महिन्यांसाठी मोफत पार्किंग सुविधा, वाहनांचा हप्ता-विमा हप्ता भरण्यासाठी वाढीव मुदत आणि विविध शासकीय करात सूट देण्याची आग्रही मागणी केली आहे.
गेले काही महिन्यांपासून परदेशातील कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशात येणार्या परदेशी पर्यटकांना मोठी गळती लागल्याने खासगी प्रवासी वाहतूक उद्योगाला मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. त्यातच आता ३१ मार्च पर्यंत खासगी ट्रॅव्हल्सकडून होणार्या देशांतर्गत वाहतूक व्यवसायावर शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून निर्बंध आणले आहेत. त्यामुळे आधीच आर्थिक संकटात सापडलेला प्रवासी वाहतूक उद्योग आता कायमस्वरूपी ठप्प होतो की काय अशी भीती निर्माण झाली आहे. कारण एकंदरीत निर्माण झालेली परिस्थिती पूर्ववत सुरळीत होण्यास किमान ३ महीने किंवा त्याहीपेक्षा अधिक कालावधी लागणार असल्याचे सर्व वाहतूकदारांचे म्हणणे आहे. शिवाय जवळपास पुढील ४० दिवस या बसेस आणि टुरिस्ट वाहने बंद राहणार असल्याने गाडीचा हफ्ता, विमा हफ्ता, चालकांचा पगार याचा अतिरिक्त भार व्यवसायिकांनाच सहन करावा लागणार आहे.
याकाळात खासगी बस वाहने नेमकी उभी कुठे करायची, असा प्रश्न देखील उपस्थित झाल्याने मुळातच शहरात असलेली जागेची वानवा लक्षात घेता आता प्रशासनानेच मोफत पार्किंग सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी या सर्व संघटनातर्फे करण्यात येत आहे. कोरोनामुळे अनपेक्षित एवढा मोठा आर्थिक फटका सहन करावा लागल्याने डबघाईला आलेल्या खासगी प्रवासी वाहतूक उद्योगाला वाचविण्यासाठी किमान पुढील ३ महिन्यांसाठी वाहन कर, रस्ते कर माफ करणे, पुढील ३ महिन्यांचा वस्तु सेवाकर भरण्यासाठी वाढीव मुदत द्यावी, विमा आणि गाड्यांचा हफ्ता भरण्यासाठी ६ महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी अशा विविध मागण्या सर्व वाहतूकदार संघटनेच्या वतीने हर्ष कोटक, मलिक पटेल आणि मोहन गोयल यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे केल्या आहेत. जर ही परिस्थिती सुधारली नाही तर शेतकर्यांप्रमाणे वाहतूक व्यवसायिकांवरही आत्महत्या करण्याची वेळ येईल अशी चिंता देखील या सर्व वाहतूक व्यवसायिकांनी व्यक्त केली आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम