
मित्रांनी whatsapp वर ब्लॉक केलं म्हणून तरुणाने केली आत्महत्या, मुंबईतली धक्कादायक घटना
या घटनेनंतर मुलांना समाज माध्यमांचा वापर करताना काही शिष्टाचार शिकवण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
- by Sanjay Pachouriya
- Feb 26, 2020
- 1222 views
मुंबई (प्रतिनिधी) : एका १८ वर्षांच्या मास मीडियाचे शिक्षण घेणाऱ्या किशोरवयीन मुलाने वसई येथे आपल्या घरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येमागील कारण वाचल्यानंतर तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. त्याच्या वर्गमित्रांनी त्याला व्हॉट्सॲप ग्रुपवरुन ब्लॉक केल्याच्या छोट्याशा कारणाने त्याने टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर आली आहे.
जय हा (नाव बदललेले आहे) सांताक्रुझ येथील एका महाविद्यालयातील BMM च्या पहिल्या वर्षात शिकत होता. त्याच्या वर्गमित्रांचा ‘नामूनी’ (Namunee) नावाचा एक व्हॉट्सॲप ग्रुप होता. या ग्रुपवर त्याचे मित्र जयसोबत दुर्व्यवहार करीत असतं. अनेकदा त्याच्यावर अरेरावी केली जात. या ग्रुपमध्ये अनेक मित्रांनी त्याला आत्महत्येचे विविध पर्याय सांगितल्याची धक्कादायक बाब मृत जयच्या वडिलांनी सांगितली आहे.
सध्या समाज माध्यमांवर अशा स्वरुपाची आक्रमक वृत्ती वाढताना दिसत आहे. यावर वेळीच नियंत्रण आणणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे
समाज माध्यमांवरील शिष्टाचार
चॅट करताना समोरच्या व्यक्तीची प्रतिक्रिया आपल्याला दिसत नाही. आपण सांगितलेली एखादी बाब त्याच्यावर कसा परिणाम करते हे आपल्याला कळत नाही. आपण प्रतिक्रिया देऊन व्हॉट्सॲप बंद करतो, पण समोरचा व्यक्ती त्यामुळे दुखावला गेला असेल की नाही याबाबत आपण विचारही करीत नसल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जयच्या वर्गमित्रांनी २०१९ मध्ये नामूनी नावाचा व्हॉट्सॲप ग्रुप तयार केला होता. यामध्ये जयचे मित्र अश्लिल संवाद करायचे. यावर जयने आक्षेप नोंदविला होता. यामुळे त्याच्या मित्रांनी त्याला ग्रुपमधून काढून टाकले. मात्र त्यानंतरही त्याने मित्रांना पर्सनलवर पुन्हा ग्रुपमध्ये सहभागी करुन घेण्याची विनंती केली, असे जयच्या वडिलांनी पोलिसांच्या चौकशीदरम्यान सांगितले. जय अभ्यास हुशार होता. त्यामुळे त्याचे मित्र अभ्यासासाठी त्याला whatsapp ग्रुपमध्ये सहभागी करुन घेत व काम झाल्यावर त्याला काढून टाकत होते. गेल्या काही दिवसांपासून जय अत्यंत शांत होता. दोन आठवड्यांपासून तो कॉलेजलाही जात नव्हता, अशी माहिती त्याच्या वडिलांनी दिली. आम्ही त्याला याबाबत अनेकदा विचारणा केली मात्र त्यादरम्यान तो तापाने खूप आजारी झाल्याचे त्यांनी नमूद केले. त्यानंतर त्याने राहत्या घरात स्वत:चे आयुष्य संपवले. या घटनेनंतर मुलांना समाज माध्यमांचा वापर करणाऱ्यांना काही शिष्टाचार शिकवण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
रिपोर्टर
Reporter
आदर्श महाराष्ट्र वेब टीम