
महाराष्ट्राला झालंय काय! ठाण्यात एकाला चोर समजून दगड-विटांनी ठेचून मारलं
चोर समजून एका चाळीस वर्षीय व्यक्तीची दगड-विटांनी ठेचून हत्या करण्यात आली. त्याचा साथीदारही गावकऱ्यांच्या हल्ल्यात जबर जखमी झाला आहे.
- by Reporter
- Feb 10, 2020
- 1920 views
ठाणे (प्रतिनिधी): महाराष्ट्र हिंगणघाटच्या जळित कांडासारख्या विकृत प्रकरणाने हादरला असताना आणखी एक अमानुष प्रकरण समोर आलं आहे. चोर समजून एका चाळीस वर्षीय व्यक्तीची दगड-विटांनी ठेचून हत्या करण्यात आली. त्याचा साथीदारही गावकऱ्यांच्या हल्ल्यात जबर जखमी झाला आहे.
सोमवारी पहाटे ठाणे जिल्ह्यातल्या खातिवलीमध्ये ही घटना घडली. दोन व्यक्ती संशयास्पदरीत्या हालचाली करताना दिसल्यामुळे गावातल्या एकाने चोर समजून आरडाओरडा केला. तो ऐकून लोक गोळा झाले आणि त्यांनी त्या व्यक्तीचा पाठलाग सुरू केला. गावकरी मागे लागलेले पाहताच त्या दोन व्यक्ती भिंत चढून पळून जाऊ लागल्या. त्याच प्रयत्नात दोघं खाली पडले आणि गावकऱ्यांच्या तावडीत सापडले. त्यांना नागगिकांनी दगड-विटांनी मारायला सुरुवात केली. ते कोण होते, रात्री तिथे काय करत होते याचा अद्याप उलगडा झालेला नाही. पण नागरिकांनी कायदा हातात घेत त्यांना अमानुष मारहाण केली.
पोलीस निरीक्षक राजू वंजारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोघे चोरीच्या उद्देशाने तिथे आले असावेत. दोघेही गुजरातच्या पंचमहल भागात राहणारे आहेत. मृत व्यक्तीचं नाव दिनेश मावी असं असल्याचं समजतं. नागरिकांनी दगड-विटांनी मारहाण केल्यानंतर संशयितांना पोलिसांच्या हवाली केले. त्यावेळी दोघांची अवस्था नाजूक होती. सरकारी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी त्यापैकी एकाला - दिनेश मावीला मृत घोषित केलं.
पोलिसांनी या प्रकरणी 8 स्थानिक नागरिकांविरोधात खुनाचा आणि दंगल करण्याचा गुन्हा नोंदवला आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.
रिपोर्टर