महाराष्ट्र भाजपमध्ये मोठ्या बदलाची शक्यता, पंकजा मुंडेंना मिळणार प्रदेशाध्यपद?

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात बोलावण्याची शक्यताही आहे. त्यांना केंद्रात जबाबदारी देऊन महाराष्ट्रात नव्या नेत्याला संधी दिली जाऊ शकते.

मुंबई (प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुकांना आता काही महिने उलटून गेले आहेत. या निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष असला तरी पूर्ण बहुमत मिळालं नव्हतं. त्यामुळे नंतर मोठं महाभारत राज्यात घडलं आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आलं. यानंतर आता भाजपचं हायकमांड महाराष्ट्रात मोठे बदल करण्याची शक्यता असल्याचं बोललं जातंय. राज्यातल्या राजकारणाची सध्याची दिशा आणि इतर गोष्टी लक्षात घेऊन अमित शहा यांनी महाराष्ट्रात लक्ष घालण्याचा निर्णय घेतल्याचं बोललं जातंय. विधानसभा निवडणुकीच्या काळात अनेक घटना घडल्या होत्या. पंकजा मुंडे या दिग्गज नेत्या पराभूत झाल्या होत्या. त्यामुळे पक्षांतर्गतही नाराजी उफाळून आली होती. त्या पार्श्वभूमीवर काही मोठे बदल होऊ शकतात अशी शक्यता व्यक्त केली जातेय.

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात बोलावण्याची शक्यताही आहे. त्यांना केंद्रात जबाबदारी देऊन महाराष्ट्रात नव्या नेत्याला संधी दिली जाऊ शकते. असं झालं तर चंद्रकांत पाटील यांची विरोधीपक्ष नेते पदावर निवड होऊ शकते तर पंकजा मुंडे यांना प्रदेशाध्यक्षपद दिलं जाऊ शकते. विधानसभा निवडणुकीतल्या पराभवानंतर त्या सध्या नाराज आहेत.

राज्यातल्या महाविकास आघाडीला सत्तेवर येऊन आता तीन महिने होणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आली. तीन वेग वेगळ्या विचारांचे पक्ष सत्तेत आल्याने अगदी पहिल्या दिवसांपासूनच या पक्षांमध्ये कुरबुरी सुरू असल्याचं पुढे आलंय. त्याचाच फायदा घेत भाजप ठाकरे सरकारविरुद्ध व्ह्युरचना आखत असून राज्य सरकारला धक्का देण्यासाठी तयारी करत आहेत. दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीमुळे भाजपचे हायकमांड सध्या दिल्लीत व्यस्त आहेत. त्यामुळे दिल्ली निवडणुका झाल्यानंतर महाराष्ट्रात पुन्हा 'ऑपरेशन लोटस' सुरू होणार असल्याची माहिती पुढे आल्याने महाविकास आघाडीच्या पक्षांमध्ये खळबळ उडाली आहे.महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांमध्ये अस्वस्थता आहे. सरकार किती दिवस टिकेल याची कुणालाच शाश्वती नसल्याने सगळेच जण आपलं काम दिसून यावं म्हणून धडपड करत आहेत. त्यामुळे श्रेयाचं राजकारणही सुरू झालंय. राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं त्या मानाने चांगलं सुरु असल्याने काँग्रेस अस्वस्थ आहे. त्यातून कुरबुरी वाढत आहेत.

ही स्थिती लक्षात घेऊन भाजपमधला एक गट हा 'ऑपरेशन लोटस'साठी प्रयत्नशील आहे. राष्ट्रवादी किंवा शिवसेना यापैकी कोण सोबत येवू शकेल याची चाचपणही करण्यात येत आहे. तर भाजपमधल्या काही नेत्यांना राष्ट्रवादीला सोबत घेऊ नये असं वाटतंय. शिवसेनेना सोबत घ्यायला आम्हाला काहीही अडचण नाही अशी माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी एका वाहिनीशी बोलतांना दिलीय.

संबंधित पोस्ट