
रोजगारासाठी पुन्हा उदासिनता
८०८ उमेदवारांची उपस्थिती ; ३६४ उमेदवारांची निवडम
- by Reporter
- Jan 20, 2020
- 811 views
नाशिक(प्रतिनिधी):उच्चशिक्षण असूनही नोकरी मिळत नसल्याची ओरड करणारे विद्यार्थी एकीकडे असताना दुसरीकडे शासनातर्फे आयोजित रोजगार मेळाव्यात उपलब्ध जागांच्या तुलनेत कमी उमेदवार उपस्थित असल्याचे वास्तव समोर आले. रोजगार मेळाव्याला उमेदवारांची अल्पहजेरी हे समीकरण नित्याचे झाले असून, यंदा १ हजार ७८ जागांसाठी ८०८ उमेदवार उपस्थित होते. यामुळे रिक्त जागेमागे किमान एक उमेदवार, असे चित्रही दिसून आले नाही.
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नाशिक आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतर्फे शनिवारी (दि.१८) पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार व उद्योजकता मेळावा घेण्यात आला. मेळाव्यात २४ संस्थांतर्गत १ हजार ७८ पदांसाठी थेट मुलाखती घेण्यात आल्या. दहावी ते पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. थेट मुलाखतीद्वारे मेळाव्यातून ३६४ उमेदवारांची पदांवर प्राथमिक निवड झाली. जागांच्या तुलनेत या मेळाव्यात कायमच अल्प उमेदवार असतात. यंदाही रिक्त जागांइतके उमेदवार उपस्थित नसल्याने निम्माच उमेदवारांची निवड झाली.मेळाव्यास कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग नाशिकचे उपसंचालक सुनील सैंदाणे, सहायक संचालक संपत चाटे, विभागाचे अधिकारी संदीप गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
योजनांची माहिती
मेळाव्यात उमेदवारांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य करणाऱ्या सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, इतर मागासवर्ग विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मागासवर्ग विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मकार विकास महामंडळ या अंतर्गत योजनांची माहिती देखील देण्यात आली.
रिपोर्टर