JNU हिंसाचारावरून औरंगाबादमध्ये राडा, राष्ट्रवादीचा भाजपच्या कार्यालयावर हल्ल्याचा प्रयत्न

२५ ते ३० कार्यकर्ते भाजपच्या ऑफिसजवळ आले होते. अतिशय आक्रमक घोषणाबाजी करत ते ऑफिसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते.

औरंगाबाद (प्रतिनिधी):राजधानी दिल्लीतल्या JNU हिंसाचाराचे आता राज्यभर पडसाद उमटत आहेत. मुंबई पाठोपाठ राज्यातल्या इतर शहरांमध्येही आता विद्यार्थी संघटना रस्त्यावर उतरल्या आहे. औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीच्या विद्यार्थी संघटनेनं आज आक्रमक आंदोलन केलं. रविवारी JNU मध्ये विद्यार्थ्याच्या एका गटाने लोखंडी रॉड आणि सळ्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली. यात अनेक विद्यार्थी जखमी झाले. या हिंसाचारावरून डाव्या विद्यार्थी संघटना आणि भाजपची संबंधीत असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले आहेत. रविवारी JNU मध्ये वातावरण तापलं होतं. त्या घटनेचा विविध राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी निषेध केलाय.

औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीच्या युवक संघटनेने भाजपच्या शहर कार्यालयावर मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला. २५ ते ३०  कार्यकर्ते भाजपच्या ऑफिसजवळ आले होते. अतिशय आक्रमक घोषणाबाजी करत ते ऑफिसमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते. मात्र पोलीस सकाळपासूनच भाजपच्या कार्यालयात उपस्थित असल्याने हल्ल्याचा प्रयत्न उधळला गेला असा दावा भाजपने केलाय.

नाशिकमध्येही राडा

नाशिकमध्ये (nashik) राष्ट्रवादी युवकचे कार्यकर्ते आक्रमक झालेले पाहायला मिळाले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) कार्यालयावर धडक दिली. यावेळी हे दोन्ही गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ABVP च्या कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. तसंच कार्यालयात घुसण्याचा प्रयत्नही केला. त्यानंतर ABVPचे कार्यकर्तेही आक्रमक झाले. त्यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. मात्र आक्रमक कार्यकर्त्यांनी यावेळी दगडफेक करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे.

JNU हल्ल्याचा देशभर निषेध, महाराष्ट्रातही निदर्शने

राजधानी दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (JNU) रविवारी रात्री पुन्हा एकदा तुफान राडा झाला. त्याचे पडसाद पुण्यासह मुंबईतही पाहायला मिळाले. विद्यार्थी आणि प्राध्यपकांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मशाल हातात घेत एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांची कॅम्पसमध्ये घोषणाबाजी केली. विद्यार्थी संघटनांनी 'नही सेहेंगे नही सेहेंगे दादागिरी नही सहेंगे'च्या जोरदार घोषणा दिल्या आहेत. मुंबईतही विविध विद्यार्थी संघटनांनी जेएनयूमध्ये झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आंदोलन पुकारलं आहे. गेटवे ऑफ इंडियासमोर आणि पवईमध्ये विद्यार्थी आंदोलन करत आहेत.



संबंधित पोस्ट