
अजित पवारांनी हातमिळवणी करताच सिंचन घोटाळ्यांच्या ९ फाइल बंद
- by Adarsh Maharashtra
- Nov 25, 2019
- 882 views
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी केली असतानाच, देशभरात गाजलेल्या ७२ हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यातील नऊ प्रकरणांच्या चौकशीची फाइल बंद करण्यात आली आहे. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत सिंचन प्रकल्पांच्या उघड चौकशीची ही फाइल आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर महासंचालक बिपीन कुमार सिंह यांनी एका पत्रकाद्वारे अमरावतीच्या पोलीस अधीक्षकांना (एसीबी) याबाबत कळवले आहे. दरम्यान, ९ प्रकरणांच्या चौकशीची फाइल बंद करण्यात आल्याचे समोर आल्यानंतर अजित पवार यांना दिलासा मिळाल्याचे बोलले जात होते. मात्र त्यावर लगेचच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने स्पष्टीकरण देत अजित पवार यांच्याशी संबंधित कोणत्याही प्रकरणाची चौकशी बंद करण्यात आलेली नाही, असे नमूद केले. विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळांतर्गत सुरू असलेल्या सिंचन प्रकल्पांच्या चौकशीची फाइल बंद करण्याबाबतच्या अंतिम चौकशी अहवालाचे अवलोकन लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या महासंचालकांनी केले आहे. भविष्यात आवश्यकता भासल्यास सरकारने काही नियम केल्यास किंवा न्यायालयाने आदेश दिल्यास या प्रकरणांची पुन्हा चौकशी करण्यात येईल, असे पत्रकात म्हटले आहे. एसीबीच्या सूत्रांच्या माहितीनुसार, बंद करण्यात आलेली प्रकरणे ही सशर्त होती. या प्रकरणांची अधिक माहिती समोर आल्यास किंवा न्यायालयानं पुढील चौकशीचे आदेश दिल्यास चौकशीची फाइल पुन्हा उघडली जाऊ शकते. ज्या प्रकरणांची चौकशी बंद केली आहे, त्या प्रकरणांमध्ये अजित पवार यांच्या विरोधात कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत, असंही सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक परमबीर सिंग यांनी सांगितलं की, 'ज्या प्रकरणांची चौकशी बंद करण्यात आली आहे, त्याच्याशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा संबंध नाही.'
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम