
‘जगप्रसिद्ध अलेक्झांड्रीया ग्रंथालय एशियाटीक सोसायटीशी सहकार्य करण्यास उत्सुक’ -इजिप्तच्या राजदूतांची माहिती
- by Adarsh Maharashtra
- Apr 24, 2019
- 1229 views
मुंबई : इजिप्तमधील दुसरे मोठे शहर असलेल्या अलेक्झांड्रीया येथील जगप्रसिद्ध अलेक्झांड्रीया ग्रंथालय मुंबईच्या एशियाटिक सोसायटीशी सहकार्य करण्यास उत्सुक आहे. या संदर्भात आपण लवकरच एशियाटिक सोसायटीच्या विश्वस्तांशी संपर्क करणार असल्याची माहिती भारतातील नवनियुक्त इजिप्तच्या राजदूत डॉ. (श्रीमती) हिबा सलाहेल्दिन अल्मारास्सी यांनी आज येथे दिली.
राजदूतपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथमच मुंबई भेटीवर आलेल्या डॉ. हिबा अल्मारास्सी यांनी आज राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची राजभवन येथे भेट घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या.
सम्राट अशोकाच्या काळापासून भारताचे इजिप्तशी राजनैतिक संबंध असल्याचे सांगून आज या संबंधांना नव्याने चालना देण्यासाठी आपण कार्य करणार आहोत. अलेक्झांड्रीया हे मुंबईशी साधर्म्य असलेले शहर व बंदर असून उभय शहरांमध्ये सामंजस्य करार व्हावा तसेच मुंबई व कैरो येथील स्टॉक एक्स्चेंज यांच्या दरम्यान सहकार्य वाढावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या संदर्भात आपण मुंबईतील विविध उद्योग- वाणिज्य संस्थांच्या प्रतिनिधींना भेटल्याचे त्यांनी सांगितले.
इजिप्त देशाला पुरातन वारसा जतन क्षेत्रात व्यापक अनुभव असून या संदर्भात भारताशी सहकार्य करण्यास अधिक वाव आहे. इजिप्तमधील लोक भारतीय चित्रपटांचे मोठे चाहते असल्याचे सांगून भारतीय चित्रपट निर्मात्यांनी इजिप्त येथे चित्रपटांचे छायाचित्रण केल्यास त्यातून उभय देशातील पर्यटनाला चालना मिळेल, असे त्यांनी सांगितले.
इजिप्शियन इंटरनेशनल सेंटर फॉर एग्रीकल्चर या संस्थेमध्ये प्रगत कृषी शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या भारतीयांकरिता शिष्यवृत्ती उपलब्ध आहे. भारतीयांनी त्याचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.
पश्चिम आशियामध्ये शांती आणि स्थिरता कायम ठेवण्याच्या कामी इजिप्तची भूमिका सर्वात महत्वाची असल्याचे नमूद करून इजिप्तने महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांशी सहकार्य केल्यास आपण कुलपती या नात्याने निश्चितपणे मदत करू, असे आश्वासन राज्यपालांनी यावेळी दिले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम