
लोकसभा निवडणुकीत दानवेंना पराभूत करू , येवल्यातील पत्रकार परिषदेत आमदार बच्चू कडूंचा इशारा
- by Adarsh Maharashtra
- Jan 28, 2019
- 1402 views
सर्वच राजकीय पक्ष नालायक आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शेतकऱ्यांना न्याय दिला नाही म्हणून जनतेने भाजप-शिवसेनेला सत्ता दिली. परंतु हे पक्षही शेतकऱ्यांशी प्रामाणिक राहिले नाही. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी तर शेतकऱ्यांना उद्देशून ‘साले' म्हटले. त्यामुळे शेतकऱ्यांना हिणवणाऱ्या दानवेंना येत्या लोकसभा निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देण्याचा ‘विडा’ मी उचललाय असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी येवल्यातील पत्रकार परिषदेत दिला.
जाहीर सभेसाठी आमदार कडू सोमवारी येवल्यात आले होते. यावेळी शासकीय विश्रामगृहावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कांदा उत्पादकांचे प्रश्न महत्वाचे असून शासन याबाबत उदासीन आहे. उत्पादनात राज्यात कांदा चौथ्या, पाचव्या क्रमांकावरील नगदी पीक असताना सरकारची कांद्याला हमीभाव देणे ही जबाबदारी असल्याचे कडू यांनी सांगितले. पणन खात्यानेही समोर येणे गरजेचे असून रेकॉर्डवर कांद्याचा उत्पादन खर्च येणे अपेक्षित अाहे. शासनाने यावर शिक्कामोर्तब करावे, असे आवाहनही कडू यांनी केले. शेतकऱ्यांचा तोटा बघून शासनाने निर्यात धोरण ठरवावे. खाणाऱ्यांना लक्षात ठेवून निर्यात धोरण शासन ठरवतेय हे चुकीचे असल्याचे मत आमदार कडू यांनी मांडले. कांद्याला १८०० रुपये प्रति क्विंटल भाव दिला पाहिजे, अशी आमची मागणी अाहे.
भाजपचे सरकार दिल्लीत पडले होते, म्हणून तिच भीती केंद्रातील सरकारला आजही आहे. मात्र, शासनाने हमी भाव न दिल्याने आता तिच भिती आम्हाला पुन्हा निर्माण करावयाची आहे. कांद्याला जीवनावश्यक यादीतून वगळावे, अशी आमची मागणी अाहे. जीवनावश्यक यादीत कांद्याला का टाकले याचे एक तरी कारण राज्यकर्त्यांनी द्यावे. शासनाने निर्णय न घेतल्यास येत्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीत कांदा उत्पादक मतदान करणार नाही, असा इशारा देतानाच आमदार कडू यांनी नाशिक येथे राज्यव्यापी कांदा परिषद घेऊन सरकारला धडा शिकविण्याचा इशारा दिला. येत्या लोकसभा निवडणुकीत एक-दोन जागांवर आम्ही निवडणूक लढविणार असून विधानसभेत जनतेच्या प्रश्नांसाठी लढणारा एकटाच आहे. विधानसभेत १० आमदार माझ्या सोबत प्रहारचे असतील. यासाठी आम्ही विधानसभेच्या अधिक जागा लढवू असेही त्यांनी सांगितले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम