
महार रेजिमेंटच्या शूरवीरांचा गौरव;गेट वे ऑफ इंडियावर 15 डिसेंबरला कार्यक्रम
- by Adarsh Maharashtra
- Dec 13, 2018
- 1186 views
मुंबई : आपल्या अतुलनीय शौर्याच्या बळावर देश संरक्षणात बाजी मारलेल्या महार बटालियनच्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महार बटालियनच्या अमृत महोत्सवानिमित्त मुंबईच्या गेट वे ऑफ इंडिया येथे शनिवार, दि. 15 डिसेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण व भव्य सत्कार समारंभ आयोजित केला असून या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
श्री. बडोले म्हणाले, महार रेजिमेंटच्या सैनिकांनी युध्दकाळात आणि शांतीकाळात आपल्या कर्तव्यदक्षतेमुळे जगभरातल कीर्ती मिळविली. महार रेजिमेंटने 9 युध्दक्षेत्र सन्मान आणि 12 रणक्षेत्र सन्मान मिळविले आहेत. तसेच 1 परमवीर चक्र, 1 अशोक चक्र, 9 परम विशिष्ट सेना पदक, 4 महावीरचक्र, 4 कीर्तीचक्र, 1 पद्मश्री, 3 उत्तम युध्द सेवा पदक, 16 अतिविशिष्ट सेवा पदक, 30 वीरचक्र, 39 शौर्यचक्र पदक, 220 सेना मेडल आणि बरेच इतर पुरस्कार मिळविलेले आहेत. याशिवाय महार रेजिमेंटने 2 चिफ ऑफ आर्मी स्टाफ तसेच 2 आर्मी कमांडर भारतीय सेनेला देण्याचा मान मिळविला आहे.
अशा शौर्यशाली सैनिकांचे स्मरण करून त्यांच्या आणि त्यांच्या कुटूंबियांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. शूरवीर आणि लढवैय्या महारांनी भारतीय सैन्याची मान सदैव उंच ठेवली. सैन्यातील शौर्याला एका सन्माननीय उंचीवर पोहचविले. प्रचंड देशभक्ती आणि देशाच्या संरक्षणासाठी तत्परता यासाठी महार बटालियन सदैव अग्रेसर राहिलेली आहे. महार समाजात जन्म घेणाऱ्या प्रत्येक माणसाला त्यांच्या पूर्वजांनी गाजविलेला इतिहास उजागर करून त्याची पुनरावृत्ती करण्यासाठी नव्या पिढीला प्रोत्साहन दिले पाहिजे, असेही श्री. बडोले म्हणाले.
शौर्यशाली सैनिकांचे स्मरण करून त्यांच्या आणि त्यांच्या कुटूंबियांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा आम्ही निर्णय घेतला. त्यांना गौरविण्यासाठी त्यांना पुरस्कार देण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. इतिहासात महार रेजिमेंटच्या पराक्रमी सुपूत्रांचा सन्मान करणारे महाराष्ट्र शासन पहिले शासन असल्याचेही श्री. बडोले म्हणाले.
यावर्षी देण्यात येणाऱ्या 2 पुरस्कारांमध्ये महाविर चक्र मेडल आणि अनसंग हिरो मेडलसाठी प्रत्येकी 51 हजार रूपयांचा धनादेश, 16 विरचक्र मेडलसाठी प्रत्येकी 31 हजार, 26 सेवा मेडलसाठी प्रत्येकी 21 हजार आणि 1 अति विशेष सेवा मेडलसाठी 16 हजार तर 4 विशेष सेवा मेडलसाठी प्रत्येकी 15 हजार रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह आणि शाल-श्रीफळ देऊन गौरव करण्यात येणार आहे. अशा कार्यक्रमातून भावी पिढीला सैन्यात भरती होण्याचे प्रोत्साहन आणि प्रशिक्षण देण्यासाठी लवकरच योजना आखण्यात येत आहे. गोंदिया जिल्ह्यात प्रायोगिक तत्वावर सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण व मार्गदर्शन केंद्र तातडीने सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर राज्यात आणि राज्याबाहेरही विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची सोय करण्यात येणार आहे, असेही श्री.बडोले म्हणाले.
या कार्यक्रमास माजी सैनिक कल्याण मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत तर उद्योग मंत्री सुभाष देसाई,सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, मुंबईचे खासदार अरविंद सावंत, आमदार राहुल नार्वेकर,आमदार राज पुरहित, मेजर जनरल डी. के. पुरोहित, मेजर जनरल बिनोय पूनेन, मेजर जनरल सुधाकरजी, मेजर जनरल मनोज ओक,ब्रिगेडियर मोहन निकम यांच्या उपस्थित राहणार असल्याचे श्री.बडोले यांनी सांगितले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम