
आयएसआयच्या दोन संशयितांना नागपुरात अटक.
- by Adarsh Maharashtra
- Nov 10, 2018
- 826 views
आयएसआयच्या_दोन_संशयितांना_नागपुरात_अटक. इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या दोन संशयित एजंट्सना नागपुरात शुक्रवारी भालदारपूरा येथून ताब्यात घेण्यात आले. सैन्यदलाची गुप्तचर यंत्रणा, मुंबईतील विशेष चमू व नागपूर पोलिसांच्या एटीएसने ही कारवाई केल्याची माहिती आहे. या कारवाईनंतर चांगलीच खळबळ उडाली असून यामुळे नागपूरही आता दहशतवादी कारवायांच्या रडारवर आल्याचे स्पष्ट झाले आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एक व्यक्ती नांदेड व दुसरी उत्तरप्रदेशातील असल्याची माहिती आहे.
गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही व्यक्ती शहरात वास्तव्यास होत्या. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींच्या निवासस्थानावरून काही साहित्यही जप्त करण्यात आले असून त्याची तपासणी करण्यात येत आहे. या दोघांवरही शहरात गुप्तपणे दहशतवादी कृत्यांना चालना देणाऱ्या 'स्लीपर सेल्स'ची उभारणी करण्यात येत असल्याचा संशय आहे. यासंबंधीचे अधिक वृत्त मिळेपर्यंत ही कारवाई सुरूच होती. नागपुरात पाकिस्तानचे नागरिक राहत असल्याच्या सैन्य दलातील गुप्तचर खात्याला मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. ऑक्टोबर महिन्यात नागपुरात ब्रम्होसमधील वैज्ञानिक निशांत अग्रवालला पाकिस्तानी संस्थांना मिसाइलची माहिती पाठविच्या संशयावरून अटक करण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सैन्यदलाच्या स्पेशल विंग व केंद्राच्या सुरक्षा संस्थांनी काही कॉल ट्रेस केले, यातील अनेक कॉल्स हे पाकिस्तानात वारंवार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. विशेष म्हणजे हे सर्व कॉल्स नागपुरातून करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यावर ही कारवाई करण्यात आली. या संदर्भात गुप्तचर यंत्रणेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी गणेशपेठ पोलिस ठाण्यात एकूणच या प्रकरणात पुढील कारवाई करण्यापूर्वी काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर शहरातील काही ठिकाणी चौकशीचे सत्र सुरू करण्यात आल्याची माहिती आहे. या प्रकरणात मध्य नागपूर, आशिर्वाद सिनेमागृहाचा मागचा भाग आणि घाट रोड जवळच्या परिसरातही धाडी टाकण्यात आल्याची माहिती आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम