
पाण्यात वीजप्रवाह उतरल्याने शॉक लागून पालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू तर पाच जण गंभीर जखमी
- by Adarsh Maharashtra
- Oct 19, 2020
- 1230 views
मुलुंड:(शेखर भोसले) कुर्ला जवळील चुनाभट्टी विभागातील सुमन नगर जंक्शन जवळ नाले रुंदीकरणाचे काम चालू असलेल्या ठिकाणी तेथील जलवाहिनी फुटल्याने या जलवाहिनी दुरुस्तीच्या वेळी पाण्यात वीजप्रवाह उतरल्याने तेथे काम करीत असलेल्या पालिकेच्या दोन कर्मचाऱ्यांचा शॉक लागून मृत्यू झाला तर पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवार दि १९ रोजी घडली आहे.
पालिकेतर्फे सुमन नगर जंक्शनजवळ नाले रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाच्या वेळी मशीनद्वारे ड्रिल करीत असताना खाली वीस फूट खोल असलेली पाण्याची जलवाहिनी फुटली होती. या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी पालिकेच्या जल खात्याचे कामगार त्या ठिकाणी काम करत होते. सोमवारी सकाळी ८ वाजता जनरेटर आणि मोटारच्या सहाय्याने तेथे साचलेले पाणी उपसत असताना अचानक तेथील पाण्यात वीजप्रवाह प्रवाहित झाला आणि सात जणांना शॉक लागला. यात अमोल काळे (वय २९), राहणार चेंबूर आणि गणेश उगले (वय ३४) राहणार कल्याण या कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर महेश जाधव (वय ४०), नानासाहेब पुकळे (वय ४१), नरेश अडागळे (वय ४०), राकेश जाधव (वय ३९), अनिल चव्हाण (वय ४३) हे पाच कामगार जखमी झाले. जखमींना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नेहरू नगर पोलीस ठाणे अधिक चौकशी करीत आहे.
दरम्यान पालिकेच्या ड्युटीवर कर्तव्य बजावत असताना विजेचा धक्का लागून गणेश उगले व अमोल काळे या कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्याने दोन्ही कर्मचाऱ्यांचे कुटुंबिय एका क्षणात पोरके झाले असल्याने महापालिका सेवा नियमावली व प्रचलित कामगार कायद्यानुसार त्यांच्या कुटुंबियांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच दोन्ही मृत कामगारांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर कायम स्वरूपी नोकरी त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार देण्यात यावी, अशी मागणी म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे अध्यक्ष बाबा कदम यांनी मुंबई महानगर पालिकेच्या आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम