सगळी जबाबदारी केंद्राची! मग तुम्ही काय करणार? : चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारला सवाल

सांगली : राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे. सगळी जबाबदारी केंद्र सरकारकडे, मग तुम्ही काय करणार? असा खोचक सवाल पाटील यांनी केला आहे. तसेच मदत करण्याची पहिली जबाबदारी राज्य सरकारची आहे, असे स्पष्ट करत तातडीने ती राज्य सरकारने जाहीर करावी, अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारमधल्या मंत्र्यांकडून नुकसान भरपाईच्या बाबतीत केंद्राकडे बोट दाखवलं जातंय. यावरून चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारला धारेवर धरलं. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात राज्यात अतिवृष्टी झाली, त्यावेळी प्रभारी मुख्यमंत्रिपद देवेंद्र फडणवीस यांच्याकडे होते. त्यातही आमच्या मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या तिजोरीतून दहा हजार कोटींची तातडीची मदत जाहीर केली होती. त्यानंतर केंद्र सरकारने साडेसहा हजार कोटींची मदत दिली. तसेच नुकसानीच्या पार्श्वभूमीवर आधी निवेदन तयार करणे गरजेचे आहे, त्यानंतर किती नुकसान झालं हे पाहून मदत जाहीर केली पाहिजे. मदत करण्याची पहिली जबाबदारी ही राज्य सरकारची आहे. त्यानंतर केंद्र सरकारकडे मदत मागितली पाहिजे,असे मत चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.

तसेच यावेळी महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना अतिवृष्टी झाली, महापूर आला ,निसर्गचक्र वादळ आलं की फक्त केंद्राकडे बोट दाखवायचे. स्वतः मात्र काही मदत करायची नाही, मग तुम्ही करणार काय? असा खोचक सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना गेल्यावर्षी राष्ट्रपती राजवट लागू असताना उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना २५ हजार हेक्टरी मदतीची मागणी केली होती. त्यामुळे आता मुख्यमंत्री असणारे उद्धव ठाकरे यांनी ती मदत जाहीर करावी. कशाला पंचनामे करताय, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

आम्ही वारंवार टीका केल्याने मुख्यमंत्री आता बाहेर पडत आहेत. याबद्दल त्याचे अभिनंदन, असा उपहासात्मक टोलाही चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे. तसेच आपत्ती परिस्थिती फिल्डवर जाऊन निर्णय घ्यावे लागतात, अशी टीकाही पाटील यांनी केली. कोरोनात सर्व मदत केंद्राने केली. राज्यात कोरोनाच्या परिस्थितीमध्ये सर्व मदत केंद्र सरकारने केली आहे. गोरगरिबांना धान्यापासून, सिलेंडर, पैसे सर्व काही मदत केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. वैद्यकीय मदतही केंद्र सरकारने केली आहे, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे अतिवृष्टीबाबत मदत मागण्यासाठी जाण्याचे नियोजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करावे, भाजपाचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जरूर जातील,असंही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट