
पुणेकरांना निरोगी आरोग्य लाभू दे,पावसाळा, कोरोनाचा प्रादुर्भाव आणि सणवार एकत्र आल्याने, अधिक काळजी घेण्याची गरज -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
- by Adarsh Maharashtra
- Aug 23, 2020
- 1073 views
पुणे, दि.२३: कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी सुविधांची उभारणी राज्यभर सुरु असून पावसाळा, कोरोनाचा प्रादुर्भाव आणि सणवार एकत्र आल्याने अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे मत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केले. संपूर्ण गणेशोत्सव काळात गर्दी होणार नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी, असे आवाहन करतानाच गाफील न राहता आतापर्यंत आपण जी काळजी घेतो आहोत तीच पुढेही घ्यावी, असे आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले. सोबतच पुणेकरांना निरोगी आरोग्य लाभू दे, अशी प्रार्थनाही त्यांनी केली.
शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) परिसरात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी उभारण्यात आलेल्या कोविड रुग्णालयाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण झाले यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यक्रमस्थळी उपस्थित होते. कार्यक्रमास महापौर मुरलीधर मोहोळ, आ.सुनिल कांबळे, आ. सिद्धार्थ शिरोळे, पुणे महानगरपालिका स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, विभागीय आयुक्त सौरभ राव, पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, दीपाली डिझाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक विनय मित्तल उपस्थित होते. खा. सुप्रिया सुळे, खा. श्रीरंग बारणे, आमदार डॉ. नीलम गो-हे, आ. चंद्रकांत पाटील, आ. माधुरी मिसाळ आदी मान्यवर या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी झाले होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. कोरोनामुळे सर्वधर्मियांनी आता पर्यंतचे सगळे सण साधेपणाने घरातच साजरे करून शासनाला सहकार्य केल्याबद्दल त्यांनी सर्वांचे आभार मानले. ते म्हणाले, पुणे शहरातील गणेशोत्सव पाहण्यासाठी परदेशातून नागरिक येत असतात, श्री गणेशाची प्रतिष्ठापना आपण दरवर्षीप्रमाणे यंदाही केली आहे, मात्र यावेळेस आपल्या समोर कोरोनाचे विघ्न आहे. या विघ्नातून लवकरात लवकर मुक्ती मिळावी तसेच सामाजिक भान ठेऊन शांततेत यंदाचा गणेशोत्सव आपण साजरा करूया, अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्री ठाकरे यांनी संपूर्ण गणेशोत्सव काळात गर्दी होणार नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी असे आवाहन करतानाच कोणीही गाफील न राहता आता पर्यंत आपण जी काळजी घेतो आहोत, तीच पुढेही घेणे आवश्यक आहे तसेच मास्कचा नियमित वापर करावा, वारंवार हात धुणे, वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता तसेच सुरक्षित अंतर यावर भर देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, पुणे येथे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्सासाठी जम्बो रुग्णालयाची अत्यंत कमी कालावधीत उभारणी केली, ही उल्लेखनीय बाब आहे. पुण्यातील या कोविड रुग्णालयामध्ये अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत,कोरोनाची एक लाट ओसरल्या नंतर दुसरी लाट येते हा जग भरातील अनुभव आहे, त्यावरून आपण गाफील राहून चालणार नाही, त्यासाठीच अधिकच्या सुविधांची उभारणी करण्यात येत असल्याचे सांगून पुणेकरांना निरोगी आरोग्य लाभू दे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. लॉकडाऊन नंतर आपण काही गोष्टींमध्ये शिथिलता दिली. दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, यामुळे गाफील राहून चालणार नाही. कायम सतर्क राहावे लागणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काटेकोर नियोजन करुन आणि नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार म्हणाले, नागरिकांना आरोग्याच्या दर्जेदार सुविधा देणे ही शासनाची प्राथमिकता आहे, त्यामुळेच पुण्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत जम्बो रुग्णालयांची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. पाऊस सुरू असताना अत्यंत कमी कालावधीत या कोविड रुग्णालयाची उभारणी केली आहे. या रुग्णालयामुळे कोविड रुग्णाला वेळेत उपचार मिळणे सुलभ होणार असून पुणे, पिंपरी चिंचवड तसेच ग्रामीण भागातील रुग्णाला या सुविधेमुळे दिलासा मिळणार आहे. या रुग्णालयात मंगळवार सायंकाळपासून रुगणसेवा देण्यास सुरुवात होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. गणेशोत्सवाचा उल्लेख करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोना संसर्गाबाबतची दक्षता घेत सुरक्षित गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन केले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम