विठ्ठल मंदिर उघडण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात १ लाख वारकरी आंदोलन करणार

पंढरपूर (प्रतिनिधी) : यापूर्वी दलितांना विठ्ठल मंदिर प्रवेशासाठी साने गुरुजींचं आंदोलन सर्वश्रुत आहे तर सर्व धर्मियांना प्रवेश देण्यासाठी विनोबा भावे यांचेही आंदोलन जनता विसरलेली नाही. आता मात्र कोरोनामुळे गेल्या साडेपाच महिन्यापासून बंद असलेले विठ्ठल मंदिर भाविकांना खुले करण्यासाठी ३१ ऑगस्ट रोजी विश्व वारकरी सेना १ लाख वारकऱ्यांसमवेत मंदिर प्रवेशाचे आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाचे नेतृत्व पुरोगामी नेते प्रकाश आंबेडकर करणार असल्याने याचा धसका प्रशासनाने घेतला असल्याचे वंचितचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे म्हणाले.

वास्तविक वारकरी संप्रदाय हा सनातनी संप्रदाय असताना देवाचे अस्तित्व न मानणारे आंबेडकरांकडे याचे नेतृत्व आल्याने आंदोलनाचे महत्व वाढले आहे. कायम हिंदुत्ववादी शिवसेना व भाजप सोबत असलेला वारकरी वंचितकडे गेल्याने विचारांचे ध्रुवीकरण होताना दिसत आहे. लॉकडाउनमुळे विठ्ठल मंदिर ३१ ऑगस्ट पर्यंत बंद असल्याने आता संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. प्रशासनासोबत काल झालेली बैठक मोडल्यानंतर आमचे आंदोलन दाबल्यास दुप्पट म्हणजे २ लाख वारकरी येतील असा इशारा वंचितचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी दिला आहे.

दरम्यान २४ ऑगस्ट रोजी या प्रश्नावर जिल्हाधिकारी, विश्व वारकरी सेना व वंचित पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार असल्याचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले आहे. सध्या पंढरपूर मध्ये २०३५ कोरोना रुग्ण असल्याने शासन मंदिर उघडण्यास भीत असले तरी आता या प्रश्नाचे राजकारण सुरू झाल्याने २४ ऑगस्टच्या बैठकीत तोडगा न निघाल्यास मात्र संघर्ष अटळ बनणार आहे. या विषयावर वाद पेटला असताना सर्वसामान्य वारकरी मात्र या वाद पासून अलिप्तच आहे.

संबंधित पोस्ट