
कांतीलाल कडू यांच्या आमरण उपोषणाच्या इशाऱ्याने परिचारिका, सुरक्षा रक्षकांना पगार
29 लाखांचे अनुदान झटक्यात केले वर्ग
- by Adarsh Maharashtra
- Apr 26, 2020
- 836 views
प्रामाणिक पत्र, प्रामाणिक हेतू, प्रामाणिक प्रयत्न; मग यश येणार आणि चर्चा तर होणारच!
पनवेल: कोरोनाच्या सैतानी विषाणूविरोधात लढणाऱ्या अधिपरिचारिका, कुशल अकुशल कामगार आणि सुरक्षा रक्षकांना 24 तासाच्या आत पगार न दिल्यास घरात कोंडून घेऊन त्यांना पगार मिळेपर्यंत आमरण उपोषण करेन, असे निर्वाणीचे पत्र पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी काल, शुक्रवारी (25 एप्रिल) दिले होते. त्यानुसार सार्वजनिक आरोग्य खात्याने तातडीने 29 लाख रुपये काही तासात उपजिल्हा रूग्णालयाच्या खात्यावर वळते केले आहेत.
पनवेल उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या कुशल, अकुशल अधिपरिचारिकांचा तीन महिन्यांचा पगार थकीत होता. तर सुरक्षा रक्षकांना सहा महिने पगारापासून वंचित ठेवले होते. त्यातच हे रूग्णालय कोविड रुग्णांसाठी दिले आहे. लॉकडाऊनमध्ये कामगारांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली होती. या पार्श्वभूमीवर पनवेल संघर्ष समितीने 16 एप्रिलला राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे, आरोग्य खात्याचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त अनुप कुमार यादव, अतिरिक्त आयुक्त रमेश पतंगे यांना पत्र ई मेल करून कोविड रुग्णालयातील कामगारांचा प्रलंबित पगार मिळावा, अशी विनंती केली होती.
त्यानंतर आरोग्य मंत्री टोपे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन जाधव, अतिरिक्त आयुक्त रमेश पतंगे, उपसंचालिका गौरी राठोड यांच्याशी सतत फोन वरून पाठपुरावा कडू यांनी केला.
ठोस आश्वासन न मिळाल्याने कांतीलाल कडू यांनी काल पुन्हा खरमरीत पत्र लिहून जो पर्यंत उपजिल्हा रुग्णालयातील परिचारिका, सुरक्षा रक्षकांना पगार मिळत नाही तोपर्यंत अन्न पाणी ग्रहण करणार नाही, असे ठणकावत कडू यांनी घरात कोंडून घेऊन आमरण उपोषण करण्याचे पत्र काल डॉ. व्यास यांना दिले होते.
त्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, जिल्हाधिकारी निधी चौधरी, पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख, नवी मुंबई पोलिस आयुक्त संजय कुमार यांनाही प्रती पाठविल्या होत्या.
पोलिस आयुक्त कार्यालयातून तातडीने याबाबत कडू यांना विचारणा करण्यात आली होती. सोमवारपासून आपण उपोषण करू असे पनवेल गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक कराड यांना कडू यांनी माहिती दिली.
दरम्यान, आरोग्य खात्याचे प्रधान सचिव डॉ. व्यास यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे 29 लाखांचे अनुदान तातडीने काल संध्याकाळी पनवेल उपजिल्हा रुग्णालयाकडे वर्ग केल्याची माहिती डॉ. गौरी राठोड आणि डॉ. नागनाथ येमपल्ले यांनी कांतीलाल कडू यांना दिली. त्यामुळे उपोषण स्थगित करण्यात येत आहे असे कडू यांनी कळविले आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम