मागणी आल्यास ४८ तासांत टँकरबाबतचा प्रस्ताव पाठवा ; पालकमंत्री विजय देशमुख यांच्या सूचना
- by Adarsh Maharashtra
- Nov 13, 2018
- 1498 views
सोलापूर, दि. १३ : मागणी आल्यास ४८ तासांत टॅंकर बाबतचा प्रस्ताव पाठवावा, अशा सूचना पालकमंत्री विजय देशमुख यांनी आज दिल्या. पालकमंत्री विजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा दुष्काळ निवारण समितीची बैठक आज झाली. यावेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतू सभागृहात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र भारूड, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, अधीक्षक अभियंता धीरज साळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली आदी उपस्थित होते.
पालकमंत्री विजय देशमुख यांनी सांगितले की, `जिल्ह्यात केवळ ३८ टक्के पाऊस झाला आहे. दुष्काळाच्या निवारणासाठी राज्य शासनाने आठ उपाययोजना निश्चित केल्या आहेत. या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी होईल याकडे लक्ष द्यावे.
जिल्ह्यातील विविध तालुक्यातून आता पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी होईल. अशा प्रकारची मागणी आल्यास त्याबाबतचा प्रस्ताव दोन दिवसांत पाठवला जावा. प्रत्यक्ष पाहणी केली जावी, असे श्री.देशमुख यांनी सांगितले.
चारा पिकविण्यासाठी प्राधान्य दिले जावे. खासगी क्षेत्रातील आणि पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पिकवल्या जाणाऱ्या चाराबाबतची माहिती संकलित केली जावी, अशा सूचना श्री.देशमुख यांनी दिल्या. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी पुढील मे पर्यंत जिल्ह्यात सुमारे ५४० टँकर आणि २१७ चारा छावण्या सुरू कराव्या लागतील, असे सांगितले. शासनाने निश्चित केलेल्या आठ उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल तसेच सर्व संबंधित विभागांनीही याबाबत आवश्यक उपाययोजना कराव्यात, असे सांगितले.
बैठकीस उपजिल्हाधिकारी किशोर पवार, सचिन ढोले, मारुती बोरकर, प्रमोद गायकवाड, दीपक शिंदे, कृषी उपसंचालक रवींद्र माने, अग्रणी बँक व्यवस्थापक रामचंद्र चंदनशिवे, जिल्हा परिषदेचे शिक्षण विभागाचे श्री. भांजे, जीवन प्राधिकरणाचे चंदनशिवे आदी उपस्थित होते.
सोलापूरला २० टीएमसी पाणी राखीव ठेवणार
सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी उजनी धरणातील वीस टीएमसी पाणी राखीव ठेवण्याचा निर्णय आज घेण्यात आला. जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्पातून पिण्याच्या पाणी आरक्षित करण्यासाठी आज पालकमंत्री विजय देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक झाली.
सोलापूर शहर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी वीस टीएमसी पाणी राखीव ठेवले जाईल. त्याचबरोबर जिल्ह्यातील आठ मध्यम आणि ५६ लघु प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा नाही. त्यामुळे या प्रकल्पातील पाणी शेतीसाठी न वापरता पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवले जाईल, असाही निर्णय घेण्यात आला आहे.
अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी उजनी आणि जिल्ह्यातील विविध प्रकल्पात असलेल्या पाणी साठ्याची माहिती दिली.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम