कोरेगाव भीमा विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखोंचा उसळला महासागर

भीमा कोरेगावचा इतिहास :पेशवे आणि ब्रिटिशांमध्ये झालेल्या लढाईत महार बटालियनने महत्त्वाची भूमिका बजावून पेशव्यांच्या सैन्याचा १ जानेवारी १८१८ रोजी पराभव केला होता.

पुणे: कोरेगाव भीमा येथील ऐतिहासिक स्तंभाला अभिवादन करण्यासाठी राज्यासह देशभरातील नागरिक सोमवारी रात्रीपासूनच गावात पोहोचले आहेत.  गेल्या वर्षीच्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर यंदा पोलीस आणि जिल्हा प्रशासनाकडून विशेष तयारी करण्यात आली असून  छुपे कॅमेरे, सीसीटीव्ही, ड्रोन यांच्या साहाय्याने परिसरावर नजर ठेवली जाणार आहे. दरम्यान, भारिप बहुजन महासंघाचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी सकाळी विजय स्तंभाला अभिवादन केले. अद्यापपर्यंत दंगल घडवणार्‍यांवर सरकारकडून कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे समाजात तेढ निर्माण कसा होईल आणि दंगली कशा घडतील. हेच सरकार पाहत असल्याचा आरोप त्यांनी केला.

पेशवे आणि ब्रिटिशांमध्ये झालेल्या लढाईत महार बटालियनने महत्त्वाची भूमिका बजावून पेशव्यांच्या सैन्याचा १ जानेवारी १८१८ रोजी पराभव केला होता. या लढाईला यंदा २०१ वर्षे पूर्ण झाली. या विजयाचे प्रतीक म्हणून कोरेगाव भीमा येथे विजयस्तंभ उभारण्यात आला आहे. दरवर्षी १ जानेवारी रोजी देशभरातील विविध संस्था, संघटना आणि आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येतात. दरम्यान, गतवर्षीपेक्षा यंदा विजय स्तंभाच्या ठिकाणी येणार्‍या नागरिकांची संख्या मोठी आहे. मागील वर्षाची येथील घटना लक्षात घेता कोणत्याही प्रकारची घटना घडू नये, याची दक्षता पोलीस प्रशासनाने घ्यावी, असे आंबेडकर यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले.


गेल्या वर्षी अभिवादन करण्यासाठी आलेल्या अनुयायांवर समाजकंटकांनी दगडफेक केल्याने हिंसाचार झाला होता. या पार्श्वभूमीवर यंदा परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. पाच हजार पोलीस कर्मचारी, बारा राज्य राखीव पोलीस दलाच्या तुकड्या, घातपातविरोधी सात चमू, बाराशे होमगार्ड, दोन हजार स्वयंसेवक, आठ सहाय्यक पोलीस अधीक्षक, ३१ जिल्हा पोलीस उपअधीक्षक, १२६ पोलीस निरीक्षक, ३६० सहायक पोलीस निरीक्षक असा कडेकोट बंदोबस्त तैनात असेल. चाळीस व्हिडिओ कॅमेरे, ३०६ सीसीटीव्ही, बारा ड्रोन, पन्नास दुर्बिणी, पोलिसांच्या हेल्मेटमधील आणि छुप्या ५० कॅमेऱ्यांद्वारे बारीक नजर असेल.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट