
डॉ. विजया वाड यांच्या १२५ व्या पुस्तकाचे शानदार प्रकाशन
- by Adarsh Maharashtra
- Dec 09, 2018
- 1835 views
सुप्रसिद्ध साहित्यिका डॉ. विजया वाड यांच्या १२५ व्या पुस्तकाचे शानदार प्रकाशन चेंबूर येथील लोकमान्य शिक्षण संस्थेचे श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन येथे करण्यात आले. पाणिनी प्रकाशनच्या संगीता चव्हाण प्रकाशित या पुस्तकाचे `प्रिय आई बाबा', असे नाव असून मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख, ज्येष्ठ पत्रकार सुकृत खांडेकर, सुप्रसिद्ध लेखिका, अभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड, संगणक तज्ञ माधव शिरवळकर, सुप्रिया राणे, संगीता चव्हाण, एकनाथ आव्हाड, श्वेता चव्हाण, विश्वनाथ खंदारे, आदी मान्यवरांच्या उपस्थितीत त्याचे प्रकाशन करण्यात आले.
मुलांचा आत्मविश्वास कसा वाढवावा, संस्कारनीती, देशावर प्रेम, भयमुक्ती, एकुलत्यांना कसे वाढवावे, मालक नव्हे....पालक, अपेक्षांची ओझी, आनंदी कुटुंबाचे रहस्य अशा २४ विषयांवर विजयाबाईंनी पालकांस मार्गदर्शन केले आहे. त्यांच्या ४० वर्षांच्या शैक्षणिक अनुभवांचा परिपाक यात समाविष्ट केलेला आहे. `प्रिय आई बाबा' या यु ट्युब चॅनेल उद्घाटनही यावेळी करण्यात आले. रोज नवी गोष्ट, नवी कविता, तीही ऑडिओ व्हिज्युअल स्वरुपात, अशा प्रकारचा घराघरांत बालकोश या २२ तासांच्या संकेतस्थळाचे उद्घाटनदेखील याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हे संकेतस्थळ पर्यावरणप्रेमी गीतांनी सजलेले असून नामवंत लेखक, कवी, गायकांनी समाविष्ट केलेले आहे. डॉ. निशिगंधा वाड एज्युकेशन ट्रस्टने त्याच्या निर्मितीसाठी विशेष परिश्रम घेतले आहे. याप्रसंगी किशोरी कोश या पुस्तकांचे वाटप किशोरींनी ट्रस्टच्या वतीने करण्यात आले. ४० हजार रुपयांची पुस्तके महानगरपालिकांच्या शाळांमधील किशोरींना तर ६० हजार रुपयांची ही पुस्तके विविध शाळांमधील किशोरींना विनामूल्य देण्यात आली आहेत.
याप्रसंगी बोलताना डॉ. स्नेहलता देशमुख यांनी डॉ. विजया वाड यांनी अधिकाधिक विषयांवर लिहले पाहिजे तसेच अजूनही पुस्तकं लिहित रहावे, असे प्रतिपादन केले तर सुकृत खांडेकर यांनी मुलांना इंग्रजी उत्तम शिकवावे पण इतर विषय मातृभाषेतून शिकविले पाहिजे या मुद्यावर भर दिला. डॉ. निशिगंधा वाड यांनी संस्काराची शिदोरी घेऊन विद्यार्थ्यांनी वाटचाल केली पाहिजे व जीवनात सकारात्मकतेने राहिले पाहिजे, असे विचार व्यक्त केले. डॉ. विजया वाड यांनी या पुस्तकाच्या निर्मितीमागे अनेक विद्यार्थी, पालक, शिक्षक यांचा सहभाग तसेच आतापर्यंत अनुभव उपयोगात आल्याचे सांगितले. अन्य मान्यवरांचीही समयोचित भाषणे झाली. पूनम राणे यांनी कार्यक्रमाचे शानदार सूत्रसंचालन केले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम