डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता

बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख घटनाकार, कायदेपंडित, अर्थतज्ञ अशी आहे. परंतु पत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणून अद्यापही त्यांची तेवढी दखल घेतली गेली नाही. आंबेडकरांनी पत्रकारिता पोटभरू किंवा प्रचारकी म्हणून केली नाही तर समाजोद्धार हाच त्यांचा मुख्य हेतू होता. राष्ट्रोद्धाराचे मूलभूत अधिष्ठान त्यांना लाभलेले होते. या बाबीकडे या क्षेत्रातील तज्ञांनी जाणीवपूर्वक कानाडोळा केला.डॉ. बाबासाहेबांनी मूकनायक, बहिष्कृत भारत, प्रबुद्ध भारत या नावांनी पाक्षिके चालवली. त्यापैकी जनता आणि प्रबुध्द भारत ही त्यांच्या चळवळीची मुखपत्रे असली तरी त्यांचे संपादन त्यांनी स्वतः न करता सहकार्‍यांकडून करून घेतले. मूकनायक, बहिष्कृत भारत या दोन्ही पत्रांचे संपादन मात्र त्यांनी स्वत:च केले. संपादन क्षेत्रांमध्ये ते स्वतः प्रत्येक ओळ आणि ओळीकडे  लक्ष देत असत. कारण बहिष्कृत भारतच्या संपादकास मदत करणारा दुय्यम संपादक ठेवण्याइतकी पत्राची सांपत्तिक स्थिती नव्हती. बिन मोली संपादकीय काम करण्यास स्वार्थ त्यागी दलितातील कोणी मनुष्य त्यांना  एकही लाभला नाही. सार्वजनिक कार्याविषयी कळकळ वाटली नसल्यामुळे लोकांचा म्हणावा तितका पाठिंबा त्यांना मिळाला नाही. त्यामुळे त्यांना सर्व काम करावे लागले.बाबासाहेबांची पत्रकारिता सखोल जाणून घेण्यासाठी मूकनायक आणि बहिष्कृत भारत ही पत्रे आधारभूत आहेत. त्यातून त्यांच्या पत्रकारितेचे समग्र दर्शन घडते.
     काय करूं आता धरूनिया भीड |   
     नि:शंक हे तोंड वाजविले |
     नव्हे जगीं कोणी मुकीयांचा जाण |  
     सार्थक लाजून नव्हें हित |

                मूकनायकच्या सुरुवातीलाच बाबासाहेबांनी लिहिलेल्या ओळीतून त्यांची भूमिका स्पष्ट होते.त्याने त्यावेळी खऱ्या अर्थाने समाजाला आवाज दिला. त्याकाळच्या वृत्तपत्रांचे दोन मुख्य उद्देश होते. एक म्हणजे स्वातंत्र्याच्या आंदोलनाला गती देणे आणि समाज सुधारणा करणे. बाबासाहेबांची पत्रकारिता म्हणजे मानव मुक्तीचा धगधगता अंगार होती. समाज सुधारणा बाबासाहेबांना मान्य नव्हती. एका बाजूला राजकीय स्वातंत्र्यासाठी आकाशपाताळ एक करणारे नेते माणसाला माणसासारखी वागणूक देण्यासाठी देखील तयार नव्हते. माणसाचे निसर्गदत्त अधिकार आहेत ते मिळवून देण्याची सुद्धा त्यांना जाणीव होत नव्हती. व्यवस्थेने हजारो वर्षांपासून आवाज दाबून टाकलेल्या समाजाला मूकनायक च्या  रूपाने नवा आवाज मिळाला. बाबासाहेबांची पत्रकारिता आक्रमक तितकीच संयमी होती. त्यांच्या प्रत्येक लेखातून त्यांच्या विद्वत्तेचे दर्शन झाल्याशिवाय राहत नाही. त्यांचे लेख प्रचंड कोटीचे तत्त्वज्ञान होते.त्यांच्या मते एखादी जात अवनत झाली तर त्या अवनतीचा चट्टा इतर जातीला बसल्याशिवाय राहणार नाही.   
                   पत्रकारितेसाठी तत्कालीन परिस्थितीत फक्त आपल्या चळवळीचे मुखपत्र म्हणून त्यांनी वृत्तपत्र चालवले नाही तर एकूण जागतिक घडामोडींचा आढावा देखील त्यातून त्यांनी घेतला आहे. ते उच्च शिक्षणासाठी लंडनला जाताना मूकनायकची पूर्ण जबाबदारी त्यांनी ज्ञानदेव घोलप यांच्याकडे सोपवली. तरीही विदेशातून ते बातम्या, लेख, इतर माहिती स्वतःच पाठवत असत. बाबासाहेब शिक्षण संपवून परत येईपर्यंत ढासळत्या आर्थिक स्थितीमुळे मूकनायक बंद झाला. पुन्हा बाबासाहेबांनी पूर्ण जुळवाजुळव करून बहिष्कृत भारत च्या नावाने ३ एप्रिल १९२७ ला नवीन पाक्षिक सुरू केले. यातून त्यांची पत्रकारिता सर्वार्थाने प्रगल्भ झाल्याचे दिसून येते. त्यांचे मजकूर मांडणी अप्रतिम होते. 'आजकालचे प्रश्न' नावाने चालू घडामोडी विषयींचे सदर ,अग्रलेख ,आत्मवृत्त, विचारविनिमय, वर्तमान सार, विविध विचार संग्रह अशी त्यांची सदरे नियमित सुरू होती. 'बहिष्कृत भारत' सुरू झाले त्यावेळी महाड येथील धर्मसंगरालाही सुरुवात झाली होती. त्यामुळे अनुकूल वातावरण निर्माण करण्यात मोलाची भर घातलेली दिसून येते. या पत्रातून ही बाबासाहेबांचे भाषावैभव अत्यंत खुलून दिसते. त्यांच्या प्रत्येक शीर्षकातून त्यांची विद्वत्ता आपल्याला जाणवते. त्यांची शीर्षके, 'आरसा आहे, नाक असेल तर तोंड पाहून घ्या', 'खोट्याच्या साक्षीने खरे सिद्ध होते काय?' 'आपलेपणाची साक्ष दे, नाहीतर पाणी सोड ' 'गुण श्रेष्ठ की जात श्रेष्ठ ' 'बहिष्कृत भारताचे ऋण हे लौकिक  ऋण नव्हे काय ?' 'खरे बोल निश्चयात आहे समुच्चयात नाही' अशा  त्यांच्या शीर्षकाखाली लिखाण चालत असे. त्या लेखांमधून बहिष्कृत भारतने अक्षरशः रान पेटवले.
                      त्याकाळी बाबासाहेबांना प्रस्तावित वृत्त पत्रकारांशी देखील तेवढ्याच निकराने झुंज द्यावी लागली. दक्षिण आफ्रिकेत हिंदी लोकांना तुच्छतेने वागविण्यात येते म्हणून तुमच्या अंगाचा संताप होतो.या देशात युरोपियन, युरेशियन लोकांसाठी वेगवेगळे आगगाडीचे डबे राखून ठेवले तुम्हास खपत नाही. एडिंबरो येथील हिंदी लोकांना तिथल्या कित्तेक हॉटेलमध्ये जाऊन गोऱ्या मॅडमांबरोबर नाचण्याची बंदी केली म्हणून तुम्ही आकाशपाताळ एक केले. पण अस्पृश्यतेच्यापायी होणारी मानहानी आणि उन्नतीच्या मार्गावर होणारी कायमची बंदी यांच्यापुढे सदरील निर्बंध म्हणजे काहीच नव्हेत, ही गोष्ट तुम्हाला अद्यापि पटत नाही असे खडसावून विचारायला बाबासाहेब मागेपुढे पहात नाहीत.टीकाकारांपुढे बाबासाहेब कधीच झूकले नाहीत. आपल्या विद्वत्तेने, वाक्चातुर्याने हजरजबाबी स्वभावाने त्यांनी त्यांच्या टीकाकारांना नामोहरम केले. अत्यंत प्रतिकूल परिस्थितिशी सामना करणारी म्हणून त्यांची पत्रकारिता त्यावेळच्या इतर पत्रकारांपेक्षा अतिशय भिन्न स्वरूपाची म्हणावी लागेल. अशिक्षित, दारिद्र्याने पिचलेल्या समाजाचे नेतृत्व करायचे, त्यात वृत्तपत्र स्वतःच्या आर्थिक पायावर भक्कमपणे उभे नसलेले. अशी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही वृत्तपत्रासाठी केवळ बातम्या किंवा लेख लिहून रकानेच्या रकाने भरण्याचा धंदा त्यांनी केला नाही तर त्यातला प्रत्येक शब्द तोलून मापून लोकांपर्यंत जाईल यासाठी ते दक्ष राहिले. सध्याच्या पत्रकारितेने डॉ. आंबेडकरांच्या पत्रकारितेकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. पत्रकार वृत्तपत्र लोकप्रिय होण्यासाठी अनेक नैतिक-अनैतिक मार्गसुद्धा बिनबोभाटपणे चोखाळताना दिसतात. हल्ली तरी वृत्तपत्र चालवणे हा व्यवसाय झाला असल्याने स्पर्धा वाढली आहे. तडजोडी कराव्या लागतात. अशी मल्लीनाथी करून त्या कृतीचे समर्थन देखील केले जाते. परंतु साधन सामग्री तंत्रज्ञान उपलब्ध असून सुद्धा वृत्तपत्राचा मालक, संपादक जनतेच्या मनावर कायमची पकड घेऊ शकत नाही हेही तितकेच खरे आहे.  दारिद्र्य रेषेखाली असलेल्या ५० कोटी जनतेच्या कोणतेही प्रश्नांपेक्षा क्रिकेट, शेअर निर्देशांक आणि पुढार्‍यांच्या प्रसिद्धीला जास्त जागा दिली जाते. कुपोषित बालकांचे नाव न सांगता कोणते पौष्टिक खाद्य आहेत किंवा कोणता अभिनेता साईबाबांच्या, गणपतीच्या दर्शनाला अनवाणी गेला, कोणावर खटले चालू आहेत हे मात्र चवीचवीने सांगितले जाते. दैनिकाचा मालक अथवा संपादक जनतेचा पुढारी असतो. मात्र तो राजकीय नेता किंवा चमचा म्हणूनच वावरताना दिसतो. सर्व प्रश्नांची उत्तरे राजकीय सत्य शोधण्याची सवय त्याला लागलेली असल्याने तो फक्त पुढारी होतो. सत्ता आणि संपत्ती या दोन कारणांसाठी त्याचं पुढारीपण उरतं. अनेक सामाजिक विषयावर निकराची लढाई देण्याची आवश्यकता असूनही ते विषय त्याच्या गावीही नसतात. त्यामुळे आंबेडकरांची पत्रकारिता अभ्यासण्याची नितांत गरज आहे. ते कोट्यावधी जनतेचे नेते होते. परंतु त्यांनी व्यवसायिक तडजोड कधीच केली नाही. त्यांची कारकीर्द अंतर्मुख व्हायला भाग पाडते.
                 डॉ. आंबेडकरांचं माध्यमांशी असलेलं नातं व्यामिश्र होतं. ते संपादक तसेच सल्लागारही होते. त्यांची ही चळवळ गरीब लोकांची चळवळ होती. त्यांच्या समर्थ वर्गातील लोक कूळ वा वेठबिगार म्हणून काम करणारे वंचित होते. आर्थिकदृष्ट्या वर्ग सर्वात कमी संसाधनं बाळगून होता. त्यामुळे त्यांना काहीही पाठिंबा नसताना सुद्धा त्यांनी एकट्याच्या जीवावर सर्व पत्रकारिता चालवलेली होती. लंडनमधील द टाईम्स, ऑस्ट्रेलियातील डेली मर्क्युरी, न्यूयॉर्क टाईम्समधील न्यूज अमेरिकन जर्नल यासारख्या विख्यात आंतरराष्ट्रीय वर्तमानपत्रासह काळ्या लोकांनी चालवलेल्या वर्तमानपत्रांनी आंबेडकरांच्या अस्पृश्यताविरोधी चळवळीमध्ये आणि गांधी-आंबेडकर संघर्षामध्ये बराच रस घेतला होता. राज्यघटना निर्मितीमधील आंबेडकर यांची भूमिका संसदेतील त्यांचे युक्तिवाद, सादरीकरण आणि नेहरूंच्या मंत्रिमंडळाचा त्यांनी दिलेला राजीनामा या घडामोडींकडे जगाचं लक्ष होतं. आरंभीच्या वर्षांमध्ये राजर्षी शाहू महाराजांनी या नियतकालिकाला पाठिंबा दिला होता.त्यांनी अस्पृश्यांसाठी नवे विचारयुग निर्माण केले. अस्पृश्यांना त्यांच्या अस्तित्वाची व भवितव्याची जाणीव करून देण्याचे साधन म्हणून काम केले असे गंगाधर पानतावणे म्हणतात.मूकनायकचे कार्य संपुष्टात आल्यावर काही वर्षांनी महाड चळवळीला गती प्राप्त झालेली असताना ३ एप्रिल १९२७ रोजी आंबेडकरांनी बहिष्कृत भारत या नियतकालिकाच्या रूपाने पुन्हा पत्रकारितेत मुसंडी मारली.१९२८ साली 'समता'चा उदय झाला आणि बहिष्कृत भारतला नवसंजीवनी मिळून २४ नोव्हेंबर १९३० रोजी जनता या नावाने ते प्रकाशित होऊ लागले. 'जनता' हे दलितांचे सर्वाधिक काळ चाललेले दैनिक ठरले. २५ वर्ष सुरू राहिलेल्या जनताचं नामकरण १९५६ झाली 'प्रबुद्ध भारत' असे करण्यात आले. आंबेडकरांच्या चळवळीला प्राप्त झालेल्या गतीशी सुसंगत हा बदल होता. १९६१ सालपर्यंत हे प्रकाशन सुरू राहिलं. खऱ्या अर्थाने दलितांचं सर्वाधिक काळ सुरू राहिलेले हे स्वतंत्र प्रसार माध्यम होतं. हे सर्व पुरोगामी सवर्ण पत्रकार व संपादकांचा वापर या कार्यामध्ये करून घेतला. अनेक नियतकालिकांचे संपादन वेळोवेळी ब्राह्मण संपादकाच्या हातात होतं. 'बहिष्कृत भारत'ला पुरेसे लेखक मिळत नसल्यामुळे २४/२४ रकाने भरण्याची जबाबदारी संपादकांवर पडायची. 'प्रबुद्ध भारत' सुरू होतं तोवर त्याचं संपादन यशवंत आंबेडकर, मुकुंदराव आंबेडकर, दादासाहेब रूपवते, शंकरराव खरात ,भास्करराव काद्रेकर यांनी केले. आंबेडकरांच्या आधी काही मोजके नियतकालिक अस्पृश्यांच्या जगण्यातबाबत वार्तांकन करत असत. महात्मा फुले यांनी सत्यशोधक चळवळीतून 'दीनबंधू' हे बहुजन वर्तमानपत्र सुरू केलं होतं. ज्येष्ठ नेते गोपाळबाबा वलंगकर यांना पहिला दलित पत्रकार मानलं जातं. 'दीनबंधू', 'दीनमित्र' व सुधारक या नियतकालिकांमध्ये त्यांनी जात व अस्पृश्यतेबद्दल  केलेलं लेखन पथदर्शी ठरले. ते अतुलनीय विद्वान होते. हिंदूधार्मिक व्यवस्थेची त्यांनी केलेली चिकित्सा 'विटाळ विध्वंसक' या पुस्तकाद्वारे प्रकाशित झाली. या महान नेत्यांनी अधिकाऱ्यांचा कैवार घेण्यासाठी पत्रकारितेचा वापर केला.'सोमवंशीय मित्र' हे पहिलं दलित वर्तमानपत्र सुरू करण्याचं संपादनाचं श्रेय कांबळे यांना जातं. दलित चळवळीतील आणखी मोठे नेते इम्प्रेस मिल मधील कामगारांचे नेतृत्व केलेले किसन बनसोडे यांनी छापखाना सुरू केला होता.त्यांनी 'निराश्रित हिंदू नागरिक' 'मजुर पत्रिका' 'चोखामेळा' ही प्रकाशनं स्वतःच्या छापखान्यातून प्रकाशित केली.
              डॉ.आंबेडकरांच्या या लक्षणीय कामगिरीबद्दल १९८७ सालापासून दखल घेतली गेली. त्यांचे पत्रकारी लेखन काव्यात्म आहे, त्यात बरीच वितंडही  आहे. विरोधकांना विचारपूर्वक तोडीस तोड  प्रत्युत्तरं दिलेली आहेत. अस्पृश्यां वरील अत्याचार व कल्याणकारी धोरणे यांचा कालानुसार घटनाक्रम मांडून केलेला वैविध्यपूर्ण युक्तीवाद त्यांच्या लेखनामध्ये आढळतो. सामाजिक व राजकीय सुधारणासंबंधित सरकारी धोरणं राजकीय पक्षांच्या भूमिका या संदर्भात आंबेडकरांनी जोरकस भाष्य केलेले आहे. त्यांच्या विचारांचा मुक्त प्रवाह पाहण्याची संधी त्यांच्या पत्रकारी लेखनातून पाहायला मिळते. ते अतिशय सखोल निबंधकार व तात्विकदृष्ट्या सक्षम विचारवंत होते. त्यांनी काढलेल्या नियतकालिकांच्या आवरणावर दलितांच्या स्वातंत्र्याची व त्यांच्या जीवनानुभवांची छायाचित्रं छापलेली आहेत. पत्रकारिता हा कायमच दलित चळवळीचा अविभाज्य भाग राहिलेला आहे. दलितांच्या नेतृत्वाखालील सामाजिक व राजकीय उपक्रमांना समांतरपणे त्यांची पत्रकारिताही सुरू राहिली. आंबेडकरांच्या काळाप्रमाणे आजही दलितांना छापील माध्यमांमधील पत्रकारिता असाध्य आहे.
                आंबेडकरांचे पत्रकारी लेखन मराठीत आहे. ते लेखन आपला राष्ट्रीय ठेवा आहे. त्यामुळे त्यांचे पत्रकारी प्रहार अनेक भाषांमध्ये जनतेसाठी मुक्तपणे उपलब्ध करून द्यायला हवेत. तळागाळातील लोकांसाठी आवाज उठवणारी यंत्रणा म्हणजे पत्रकारिता आहे. ती समाजमनाचा आरसा आहे. त्यामुळे जनतेतील प्रश्न सोडवण्यासाठी पत्रकारितेचा वापर होणे गरजेचे आहे.

रिपोर्टर

संबंधित पोस्ट