
अॅक्वा टुरिझम सुरू करणार- - महादेव जानकर
- by Adarsh Maharashtra
- Nov 14, 2018
- 1645 views
मुंबई, दि. 14 : मुंबईच्या समुद्रातील सुरक्षा, मत्स्यव्यवसाय, व्यापार व प्रदूषणासंबंधीची पाहणी अरबी समुद्रात आज पदुम मंत्री महादेव जानकर यांनी केली. जेट्टीच्या ठिकाणी ॲक्वा टुरिझम विकसित करण्यात येणार असल्याचे श्री. जानकर यांनी यावेळी सांगितले.
राज्यात मत्स्योत्पादनात वाढ करण्यात आली असून, भविष्यात राज्यास मत्स्योत्पादनात स्वयंपूर्ण करण्यात येणार आहे. राज्यातील मत्स्यबीज केंद्राद्वारे मत्स्यबीज आयात थांबवता येईल आणि निर्यात करण्यास राज्य सक्षम होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
कुलाबा येथील अरबी समुद्रात बोटीने जाऊन समुद्रातील सुरक्षा, मत्स्य व्यवसाय व व्यापार आदी मत्स्य व्यवसायसंदर्भातील बाबींची श्री. जानकर यांनी आज पाहणी केली. यावेळी मत्स्य उत्पादन विभागातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. या दरम्यान श्री. जानकर यांनी राज्यातील मत्स्योत्पादनाची सद्यस्थिती तसेच भविष्यातील योजनांची माहिती पत्रकारांना दिली.
श्री. जानकर म्हणाले, राज्यात 114 कोटी मत्स्यबीज मागणी असून 60 कोटी मत्स्यबीज उत्पादन करण्यास राज्य सक्षम आहे. नीलक्रांती योजनेअंतर्गत मत्स्यबीज केंद्राद्वारे राज्यात बीज उत्पन्न वाढवून राज्यास स्वयंपूर्ण करण्याच्या दृष्टीने कार्यवाही सुरू आहे. फीड अँड सीडच्या माध्यमातून उत्पादन वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. मत्स्य व्यवसायाकडे तरुणांनी सकारात्मक दृष्टिने पहावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. उद्योगासाठी शासन ५० टक्के अनुदान देणार आहे. राज्यात मत्स्य व्यवसायासाठी 4.18 लाख हेक्टर क्षेत्रावर पाणीसाठा उपलब्ध आहे. राज्यात जलसंपदा विभागाच्या अखत्यारितील 2 हजार 579 तलाव असून जिल्हा परिषदेचे 20 हजार तलाव आहेत. या तलावांच्या माध्यमातून मत्स्योत्पादन वाढविण्यात येत आहे.
आधुनिक पद्धतींचा वापर करून होणाऱ्या अनधिकृत मासेमारीवर आळा घालण्याची कारवाई शासन करीत आहे. पर्ससीन नेट वापरत असलेल्या 122 बोटींना दंड आकारण्यात आला असून, एलईडीद्वारे मासेमारी करणाऱ्या बोटींचा परवाना राज्य शासनाने रद्द केला आहे. मच्छिमारांना नवीन तंत्रज्ञानाद्वारे मासेमारी करण्याचे प्रशिक्षण देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. पिंजरा पदधतीच्या मत्स्यसंवर्धनाकरिता ५ गावांतील सहकारी संस्थांना नर्मदा प्राधिकरणामार्फत १०० टक्के अनुदानावर २४० पिंजरे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
श्री. जानकर म्हणाले, राज्यातील समुद्र किनाऱ्यावर असलेल्या जेट्टींचा विकास करत आहोत. नॉर्वेच्या धरतीवर ससून डॉकचा विकास करत असून, जागतिक दर्जाचे डॉक तयार करत आहोत. मच्छिमारांच्या उपयोगासाठी विशेष मरीन ट्रॅफिक ॲप तयार केले आहे. या ॲपमुळे सागरी वाहतुकीसंबंधीची माहिती तसेच 12 नॉटिकल क्षेत्राच्या आत मासेमारी करणाऱ्या बोटींची माहिती समजण्यास मदत होणार आहे.
राज्यात ३० मत्स्यबीज केंद्रे कार्यरत असून, नवीन केंद्रांची स्थापना करण्यात येणार आहे. यामुळे फीड आणि बीज यासाठी राज्य स्वयंपूर्ण होणार आहे. मत्स्योत्पादनास अधिक चालना दिल्यामुळे राज्य आज मत्स्योत्पादनात देशात 7 वरून5 व्या क्रमांकावर आला आहे. भविष्यात राज्याला मत्स्योत्पादनात तिसऱ्या क्रमांकावर आणण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील असल्याचे श्री. जानकर यांनी यावेळी सांगितले.
मच्छिमारांना भेडसावणाऱ्या समस्यांचा आढावा घेण्यासाठी या पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम