Rafale Deal: 'मी खोटं बोलत नाही'; 'दसॉल्ट'च्या सीईओचं राहुल गांधींना उत्तर

नवी दिल्ली: मोदी सरकारनं फ्रान्सशी नव्यानं केलेल्या राफेल करारावरून देशात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही यात घोटाळा असल्याचा आणि 'दसॉल्ट' खोटं बोलत असल्याचा आरोप केला होता. राफेल कराराचे सत्य जनतेला सांगावे अशी मागणीही काँग्रेसनं केली होती. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं काल सर्वोच्च न्यायालयात राफेलच्या कराराची संपूर्ण माहिती सादर केली. त्यानंतर आज 'एएनआय'शी बोलताना 'दसॉल्ट'च्या सीईओंनी पुन्हा एकदा या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं.


'राफेलच्या निर्मितीसाठी दसॉल्टनं स्वत:हून अनिल अंबानींच्या कंपनीची निवड केली होती. केवळ अंबानींशीच नव्हे तर अन्य ३० कंपन्यांशी आमचा करार झाला आहे,' असं स्पष्ट करतानाच, 'मी खोटं बोलत नाही. तशी माझी ख्याती नाही आणि सीईओ पदावरच्या माणसाला तसं करताही येत नाही,' अशा शब्दांत 'दसॉल्ट'चे सीईओ एरिक ट्रॅपियर यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आरोपांना उत्तर दिलं आहे.


'अनिल अंबानींच्या कंपनीशी झालेल्या कराराबाबत आम्ही याआधीही निवेदन दिलंय. त्यात काहीही खोटं नाही. काँग्रेस पक्षानं आमच्या कंपनीविरुद्ध केलेले आरोप दुर्दैवी आहेत. काँग्रेस पक्षाशी आमचे खूप जुने संबंध आहेत. नेहरू पंतप्रधान असताना १९५३ मध्ये आम्ही भारत सरकारशी पहिला करार केला होता. अन्य पंतप्रधानांसोबतही आम्ही काम केलंय. आम्ही भारतासोबत काम करतो. कोणत्याही पक्षासाठी काम करत नाही,' असं ट्रॅपियर म्हणाले.


रिलायन्सला फायटर जेटच्या निर्मितीचा अनुभव नसतानाही त्यांना भागीदार करून घेतल्याच्या आक्षेपालही ट्रॅपियर यांनी उत्तर दिले. 'रिलायन्स हा दसॉल्टशी झालेल्या जॉइंट व्हेंचरचा केवळ एक भाग आहे. राफेल निर्मितीसाठी मिळणारा एकही पैसा थेट रिलायन्सला दिला जाणार नाही. तो पैसा 'जॉइंट व्हेंचर'ला जाणार आहे. आमच्याकडं इंजिनीअर आणि कुशल कर्मचारी आहेत. करारातील तांत्रिक व औद्योगिक टप्पा पूर्ण करण्याची जबाबदारी आमची असणार आहे. रिलायन्सनं एका वेगळ्या उद्देशानं यात पैसा टाकला आहे. दसॉल्टशी सहकार्यामुळं रिलायन्सला एअरक्राफ्ट निर्मितीचं तंत्र शिकता येणार नाही. त्यात भारताचा फायदा आहे,' असंही ट्रॅपियर यांनी स्पष्ट केलं.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट