कर्नाळा बँकेच्या ठेविदारांचे पैसे परत मिळवून देणारच! पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांची ठेविदारांना ग्वाही

‘पैसे आमच्या घामाचे, नाही कुणाच्या बापाचे’, चे दुमदुमले नारे

पनवेल(प्रतिनिधी)कर्नाळा बँके ठेविदारांच्या ठेवीचा विमा काढण्यात आला असल्याने राज्य सरकार, सहकार खात्याने त्वरीत निर्णय घेवून विम्याचे पैसे ठेविदार, खातेदारांना द्यावेत,यासाठी राज्य सरकारच्या संपर्कात आहोत. पत्रव्यवहार, संवाद सुरू असून पूर्ण ठेवी मिळवून दिल्याशिवाय लढा थांबणार नाही आणि आम्ही स्वस्थ बसणारही नसल्याची ग्वाही पनवेल संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू यांनी ठेविदारांच्या आक्रोशपूर्ण बैठकीत दिली.

पनवेल संघर्ष समितीने कर्नाळा बँक ठेविदारांची बैठक शहरातील कश्यप सभागृहात आयोजित केली होती. अतिशय उद्वेगपूर्ण बैठकीत ठेविदारांनी आपल्या भावना व्यक्त करून कांतीलाल कडू यांच्यावर विश्‍वास व्यक्त केला असून ठेविदारांना न्याय मिळवून देण्यासाठी जो निर्णायक लढा द्यावा लागेल त्याची तयारी करण्याच्या सुचना देत खातेदारांनी सर्वकष सहभागी होण्याचा एकमुखी निर्धार व्यक्त केला आहे.

 ‘पैसे आमच्या घामाचे नाही कुणाच्या बापाचे’, कांतीलाल कडू आगे बढो, हम तुम्हारे साथ है, अशा गगनभेदी घोषणांतून ठेविदारांनी त्यांच्या दोन वर्षांपासून कोंडलेल्या भावनांना अतिशय तीव्रपणे मोकळी वाट करून दिली.

 कडू यांनी ठेविदारांना दिलासा देताना सांगितले की, कर्नाळा बँकेचे 560 कोटीचे कर्ज आहे. 25 कोटीचे कर्ज त्यांनी जिल्हा बँकेकडून उचलले आहे. बँकेच्या ठेवी 529 कोटीच्या आहेत. तर बँकेची मालमत्ता 25 कोटीची आहे. संचालकांनी त्यांची मालमत्ता विकून पैसे देण्यास तयार असल्याचे प्रतिज्ञापत्र मुंबई उच्च न्यायालयात दाखल केले आहे. परंतु, ती मालमत्ता कधी विकली जाईल, नाही जाणार. गेली तर त्याचे किती पैसे मिळतील आणि त्याबाबत सहकार खात्याने आधीच कोलदांडा घालून बँकेच्या कर्जातून घेतलेल्या कर्नाळा ट्रस्टच्या मालमत्ता विकण्यास आडकाठी घातली असल्याची स्पष्ट माहिती कडू यांनी उपस्थित ठेविदारांना दिली.

 संचालकांची मालमत्ता विकली जाईल आणि ठेविदारांना पैसे परत मिळतील ही सोन्याच्या मृगासारखी गोष्ट असल्याने राज्य सरकार आणि सहकार खात्याने त्वरीत ठेविदारांच्या विम्यातून पैसे परत देण्यास सुरूवात करावी, अशी मागणी कडू यांनी लावून धरली असल्याचे सांगितले.

 विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलमताई गोर्‍हे यांनी कर्नाळा ठेविदारांसाठी सद्भावनेने उचलेले पाऊल स्वागतार्ह असल्याचे सांगून त्यांचे बैठकीत अभिनंदन करण्यात आले. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, सहकार आयुक्त अनिल कवडे, प्रधान सचिव आभा शुक्ला, अप्पर सचिव अरविंदकुमार जैन यांच्याकडून खूप अपेक्षा असल्याचे कडू यांनी सांगितले.

 बैठकीला 250 हून अधिक ठेविदारांसह संघर्ष समितीचे अध्यक्ष कांतीलाल कडू, संपर्कप्रमुख भास्करराव चव्हाण, संघटक मल्लिनाथ गायकवाड, पनवेल शहर अध्यक्ष गणेश वाघिलकर, कळंबोली शहर अध्यक्ष संतोषकुमार शुक्ला नावडे विभागीय अध्यक्ष योगेश पगडे, तळोजे विभागीय अध्यक्ष सुनील भोईर, करंजाडे विभागीय सेक्रटरी किरण करावकर, प्रदीप बावेस्कर आदी जण उपस्थित होते.

 मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची याप्रकरणी भेट घेणार!

 राज्यात आणि रायगडातही अनेक बँका घोटाळ्यात अडकल्याने ठेविदारांची वाताहात झाली आहे. ज्यांनी त्यांनी राजकारणाची पोळी भाजून घेतली. कर्नाळा बँकेच्या स्थापनेपासून मुठभर खातेदारांनी त्यांच्या उद्योग-व्यवसाय वाढीसाठी ठेविदारांचा पैसा चाणाक्षपणे वापरला असून योग्य वेळी त्याचा आपण भांडाफोड करणार असल्याचे सुचक संकेत देत ठेविदारांना न्याय देण्यासाठी लवकरच मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांची आपले शिष्टमंडळ भेट घेईल. तसेच राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लवकरच रास्ता रोको आंदोलन करणार, असे कांतीलाल कडू यांनी यावेळी सांगितले.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट