
करचुकवेगिरी प्रकरणी महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाची अटक कार्यवाही
- by Adarsh Maharashtra
- Jan 15, 2021
- 1126 views
मुंबई, दि. १५ : महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने कर चुकवेगिरी करणाऱ्या करदात्यांविरोधात कार्यवाही सुरु ठेवत दि.१५ जानेवारी २०२१ रोजी श्री. अनुज महेश गुप्ता यांस विलेपार्ले, मुंबई येथून अटक केली आहे. अनुज गुप्ता यांच्या व त्यांच्या कुटुंबियांच्या नावे सॅवी फॅब्रिक्स; शिव टेक्सटाईल, शक्ती टेक्सटाईल अशा तीन कंपन्या महाराष्ट्रात तर सुभलिन फॅब्रिक्स व शुभमंगल टेक्सटाईल अशा दोन कंपन्या दादरा व नगर हवेली येथे वस्तू व सेवाकर कायाद्यान्वये नोंदणीकृत आहेत.
या पाच संस्थांच्या माध्यमातून अनुज गुप्ता याने गेल्या चार वर्षात साधारण रू.२७० कोटीहून अधिक रकमेची फक्त देयके खरेदी केल्याचे आढळून आले आहे. कोणत्याही वस्तू व सेवेच्या प्रत्यक्ष पुरवठ्याशिवाय दाखविलेल्या या बोगस खरेदी देयकांतून या पाच कंपन्यांनी सुमारे रू.३१ कोटीहून अधिक रकमेचा बोगस Input Tax Credit प्राप्त करून घेतला तसेच रू.११ कोटीहून अधिक रकमेचा प्रत्यक्ष परतावा शासनाकडून प्राप्त केला. सदर कंपन्यांनी E-Way Bill मध्ये नावे दाखविलेल्या विविधवाहतूकदारांनी आपण या पाच कंपन्यांसाठी प्रत्यक्षात मालाची वाहतूक केली नसल्याची कबूली तपासात दिली आहे. तसेच पाच कंपन्यांकडे त्यांनी दावा केलेल्या एकूण मालापैकी फक्त २०% एवढया रकमेचा माल प्रत्यक्ष आढळून आला. उर्वरित ८०% एवढया किंमतीचा माल या कंपन्यांकडे प्रत्यक्ष आढळून आला नाही. माल दादरा नगर हवेली येथील गोडाऊनमध्ये ठेवल्याचा दावा अनुज गुप्ता यांनी केल्यामुळे दादरा नगर हवेली वस्तू व सेवाकर विभागाच्या अधिका-यांच्या मदतीने महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाच्या अधिका-यांनी तपास केला असता ही बाब उघडकीस आली.
अनुज गुप्ता यांस अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी यांच्या न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अनुज गुप्ता यांचे हे कृत्य दखलपात्र व अजामिनपात्र गुन्हा असून वस्तू व सेवाकर कायदा २०१७ नुसार ०५ वर्षापर्यंतच्या तुरुंगवासास पात्र आहे. या सलग तिस-या अटक कार्यवाहीतून महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने कर चुकवेगिरी करणा-या करदात्यांना पुन्हा एकदा गंभीर इशारा दिला आहे, असे राज्यकर उपआयुक्त (जनसंपर्क) मुंबई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम