
राज्य चतुर्थश्रेणी कर्मचा-यांचे २७ जानेवारीपासून ३ दिवस राज्यव्यापी आंदोलन – भाऊसाहेब पठाण
- by Adarsh Maharashtra
- Jan 06, 2021
- 1211 views
मुंबई : प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांनी राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार २७ जानेवारीला काळ्या फिती लावून काम, २८ जानेवारीला जेवणाच्या सुट्टीत दुपारी १ ते २ या वेळेत तीव्र निदर्शने आणि २९ जानेवारीला संपूर्ण दिवस लाक्षणिक संप करण्यात येणार असल्याची घोषणा राज्य सरकारी गट ड (चतुर्थश्रेणी) कर्मचारी मध्यवर्ती महासंघाचे नेते भाऊसाहेब पठाण यांनी केली आहे.
या कर्मचा-यांच्या मागण्या मान्य करण्या बाबतचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मुख्य सचिव, अपर मुख्य सचिव (वित्त) आदींना देण्यात आले आहे. यापूर्वी वारंवार निवेदने देऊनही कारवाई होत नसल्यामुळे हा अखेरीचा निर्णय घेतल्याचेही भाऊसाहेब पठाण यांनी सांगितले.
संघटनेच्या मागण्या अशा – वर्ग ४ ची पदे निरसित करु नये, याबाबत १४ जानेवारी २०१६ चा शासनाचा २५ टक्के चतुर्थश्रेणी पदांच्या निरसित करण्याचा निर्णय रद्द करावा, शासकीय कार्यालये आणि रुग्णालये यांचे खासगीकरण थांबवावे, अनुकंपा तत्वावरील पदे त्वरित भरली जावीत, राज्यातील वारसाहक्काची पदे तत्काळ भरावीत, सेवानिवृत्त कर्मचा-याच्या एका पाल्यास त्वरित शासनसेवेत समाविष्ट करावे, सर्व शासकीय कार्यालयातील चतुर्थश्रेणी रिक्त पदे सरळसेवा भरतीने त्वरित भरावीत, बाह्यस्तोत्राद्वारे ती भरू नयेत, वेतन त्रूटीसंदर्भात खंड २ च्या अहवालाची तत्काळ अंमलबजावणी करावी. वर्षानुवर्षे कंत्राटाने काम करणा-यांना शासकीय सेवेत समाविष्ट करून घ्यावे, आकृतीबंधानुसार सरळसेवेत तत्काळ रिक्त पदे भरण्यात यावीत, आरोग्य सेवेतील ९२५ चतुर्थश्रेणी बदली कामगारांना विशेष बाब म्हणून शासनसेवेत कायम करावे, राज्य सरकारी विमा योजना, मंत्रालय उपहार गृहे, राज्य राखीव पोलिस बल, सार्वजनिक आरोग्य विभाग येथील चतुर्थश्रेणी पदे त्वरित भरण्यात यावीत, अशा विविध स्वरुपाच्या २५ मागण्या संघटनेच्या वतीने करण्यात आल्या असून त्याबाबत त्वरित निर्णय घेण्यात यावी, असेही निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर अध्यक्ष भाऊसाहेब पठाण यांच्याबरोबरच सरचिटणीस प्रकाश बने, कार्याध्यक्ष भिकू साळुंखे, कोषाध्यक्ष मार्तंड राक्षे, यांच्या सह्या आहेत.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम