प्रयोगशील शेतकऱ्यांसाठीच्या पुरस्कारांमध्ये वाढ आता 63 ऐवजी 99 पुरस्कारांनी शेतकऱ्यांना सन्मानित करणार - कृषिमंत्री दादाजी भुसे
युवा शेतकरी व उत्कृष्ट संशोधक पुरस्कारांचा नव्याने समावेश
- by Adarsh Maharashtra
- Dec 23, 2020
- 628 views
मुंबई, दि. 23 : शेतीमध्ये नवनविन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनासाठी कृषी विभागामार्फत देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची संख्या वाढविण्यात आली असून आता 63 ऐवजी 99 पुरस्कार दरवर्षी दिले जातील. या वर्षांपासून ‘युवा शेतकरी’ आणि शास्त्रज्ञांसाठी ‘कृषी संशोधक’ या नव्या पुरस्कारांचा समावेश करण्यात आला असून काही पुरस्कारांचे निकष बदलण्यात आल्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले.
राज्य शासनामार्फत सन 1967 पासुन कृषिक्षेत्रातील उल्लेखनिय कामगिरीबद्दल विविध पुरस्कार देण्यात येतात. यामध्ये पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार, जिजामाता कृषिभुषण पुरस्कार, वसंतराव नाईक कृषिभुषण पुरस्कार, सेंद्रिय शेती पुरस्कार, उद्यानपंडीत पुरस्कार व शेतिनिष्ठ या पुरस्कारांचा समावेश आहे.
कृषिमंत्री श्री. भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या पुरस्कारांसाठी पात्रतेचे निकष बदलण्याबरोबरच त्यांची संख्या वाढविण्यास मान्यता देण्यात आली. यामध्ये तरुण शेतकऱ्यांना वाव देण्यासाठी नव्याने ‘युवा शेतकरी पुरस्कार’ व उत्तम काम करणाऱ्या शास्त्रज्ञांचा सन्मान करण्यासाठी ‘उत्कृष्ट कृषि संशोधक’ पुरस्काराचा समावेश करण्यात आला आहे. पुरस्कारांच्या निकषांमध्ये बदल करून निवड आणि शिफारशी बाबतच्या कार्यपध्दतीत सुधारणा आणि एकसुत्रीपणा येण्यासाठी बदल करण्यात आल्याचे श्री.भुसे यांनी सांगितले.
यापूर्वी कृषी विभागामार्फत एकूण 63 पुरस्कार देण्यात येत होते. त्यात काही पुरस्कारांची संख्या वाढवून नव्याने 36 पुरस्कारांची वाढ करण्यात आली असून आता 99 पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सर्व विभागातुन व सर्व जिल्ह्यातून शेतकरी निवडले जातील याची खबरदारी घेण्यात आली आहे.
पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार १, जिजामाता कृषिभुषण पुरस्कार- ८, वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कारांची संख्या ५ वरून ८ करण्यात आली आहे. सेंद्रिय शेती पुरस्कार ८, उद्यान पंडीत पुरस्कार ८, शेती मित्र पुरस्कार ३ वरून ८ करण्यात आले असून शेतीनिष्ठ पुरस्कारांची संख्या २५ वरून ४० करण्यात आली आहे. सेवारत्न पुरस्कार २ वरून ९ करण्यात आले तर नव्याने समावेश करण्यात आलेला युवा शेतकरी पुरस्कार ८ जणांना दिला जाईल. उत्कृष्ट कृषि संशोधक पुरस्काराची संख्या १ आहे.

रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम