शिवसेनेचा महाविजयी मेळावा म्हणजे ओटीटी वरचा फ्लॉप शो भाजपा आ. आशिष शेलार यांची टीका

मुंबई, दि.२६ ऑक्टोबर:विजयादशमीच्या दिवशी कोणाविषयी वाईट बोलू नये, वाईट चिंतू नये हेच आम्ही आमच्या संस्कृतीमध्ये शिकलो आहोत आणि आजही आम्ही तीच संस्कृती जगत आहोत. आम्ही खऱ्या हिंदू संस्कृतीमध्ये वाढलो आणि जगतोय,  शिवसेनेचे मात्र आम्हाला ठाऊक नाही असे म्हणत असताना विजयादशीमीच्या दिवशी शिवसेनेचा महाविजयी मेळावा म्हणजे ओटीटी प्लॅटफॉर्मवरचा फ्लॉप शो आहे अशी टीका भारतीय जनता पार्टीचे माजी मंत्री आ. आशिष शेलार यांनी केली. 

भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजीत केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये व माध्यम विभाग प्रमुख विश्वास पाठक उपस्थित होते.

श्री. शेलार म्हणाले की, विजयादशमीच्या दिवशीच्या शिवसेनेच्या महाविजय मेळाव्यातील भाषणाचे विश्लेषण करायचे तर प्रामुख्यांने तीन गोष्टी दिसून आल्या त्या म्हणजे दडपण, स्वत:ला लपवून घेणे आणि दहशत. पत्रकार अर्णब गोस्वामी आणि कंगना रणावत यांनी जे शिवसेनेबद्दल वक्तव्य केले त्याचे दडपण, संघाच्या आड स्वत:ला लपवून घेणे आणि भाजपाच्या ताकदिची दहशत किती वाटते आहे हेही दिसले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या हिंदूत्वाची आणि उद्धव ठाकरेंच्या आत्ताच्या हिंदूत्वाची कधिच तुलना होऊ शकत नाही. उद्धव ठाकरे यांचे हिंदूत्व हे काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत राहून भेसळयुक्त झालेले आहे. तेव्हा उद्धव ठाकरे यांना संघ, भाजपा कडून हिंदुत्वाचे प्रमाणपत्र घ्यावेच लागेल.  सरसंघचालकांच्या भाषणाचा विपर्यास करून घेणे स्वत:च्या अनुकूल गोष्टी भाषणातून मांडल्या गेल्या.

श्री. शेलार म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांची सत्ता टिकेल याविषयी शंका आहे. त्यामुळेच ते एकसारखे सरकार पाडून दाखवा अशी ओरड करतात. पण आमच्या नेत्यांनी  आधीच सांगितले आहे की, हिंमत असेल तर सरकार चालवून दाखवा. पण आता तर हिंमत असेल तर बाहेर उतरून दाखवा असे म्हणायची वेळ आली आहे. धर्माच्या नावाखाली सरकार पाडण्याचा प्रयत्न असा आता नविन आरोप केला जातो.  पण जे सरकार कर्माने पडणार आहे ते धर्माने पाडायची गरज नाही. कोरोना महामारीच्या सुरूवातीच्या काळाता कोरोनायुध्दोचा सन्मान करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी टाळ्या आणि थाळ्या वाजवल्या गेलेल्या मात्र त्यांचा ही हिंदूत्वाशी चुकीचा संदर्भ लावणे म्हणजे दुर्भाग्य आहे. टाळ्या आणि थाळ्या वाजवून त्यांना प्रोत्साहन नाही द्यायचे तर काय घरात बसून अंडी उबवायची का असा सवालही त्यांनी केला. ज्यांना जीएसटी हाच एक टॅक्स आहे. जीएसटी आणि टॅक्स अशा दोन वेगळ्या गोष्टी नाहीयेत हेच ज्यांना माहित नाही त्यांनी सर्वांना जीएसटी विरोधात एकत्र येण्याची भाषा करावी कमाल आहे असे ते म्हणाले.

महाराष्ट्रावर जेव्हा अतिवृष्टी, चक्रिवादळ, पूराचे संकट आलेले तेव्हा मुख्यमंत्री कुठे गेले होते असा प्रश्न आज उभा महाराष्ट्र तुम्हाला विचारत आहे. अयोध्याचा संदर्भ देताना आम्ही तीनदा अयोध्यात गेलेलो मात्र १९९२-९३ च्या वेळी तुम्ही कोणत्या बिळात लपलेलात तेही आता स्पष्ट करा. तेव्हा पंतप्रधान मोदींना देश सांभाळण्याचा सल्ला देणाऱ्यांनी स्वत:चे राज्य तर नाहीच मुंबई तरी सांभाळून दाखवा असे आवाहन शेलार यांनी दिले.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट