
कोरोना संकटकाळात बेरोजगारांना मोठा दिलासा ८५ हजार ४२८ बेरोजगारांना मिळाला रोजगार -कौशल्य विकास मंत्री श्री. नवाब मलिक
- by Adarsh Maharashtra
- Oct 17, 2020
- 779 views
मुंबई, दि.१७ : कोरोनाच्या संकटामुळे बेरोजगारीची समस्या निर्माण झाली आहे. पण असे असतानाही कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्याजिल्ह्यांमध्ये आयोजित केलेले ऑनलाईन रोजगार मेळावे तसेच महास्वयंम वेबपोर्टलमार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांच्या आधारे एकुण ८५ हजार ४२८ इतक्या बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे, अशी माहिती विभागाचे मंत्री श्री. नवाब मलिक यांनी दिली.
फक्त सप्टेंबर महिन्यात ३२ हजार ९६९ बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे. जानेवारी ते सप्टेंबर दरम्यान एकूण १ लाख १७ हजार ८४३ बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे, अशी माहिती मंत्री श्री. मलिक यांनी दिली.
मंत्री श्री. मलिक म्हणाले की, बेरोजगार उमेदवार आणि उद्योजक यांच्यामध्ये सांगड घालण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाने https://rojgar.mahaswayam.gov.in हे वेबपोर्टल सुरु केले आहे. या वेबपोर्टलवर बेरोजगार उमेदवार आपले शिक्षण, कौशल्ये, अनुभव आदी माहीतींसह नोंदणी करतात. त्याचबरोबर कुशल उमेदवारांच्या शोधात असलेल्या कंपन्या, उद्योजक, कॉर्पोरेट्स हे सुद्धा या वेबपोर्टलवर नोंदणी करुन त्यांना हवे असलेले कुशल उमेदवार शोधू शकतात. अशा प्रकारे बेरोजगार आणि उद्योजक यांच्यामध्ये समन्वय घडवून आणण्याचे काम या वेबपोर्टलमार्फत करण्यात येते.
मुंबईत सप्टेंबरमध्ये मिळाला २० हजार जणांना रोजगार
माहे सप्टेंबरमध्ये या वेबपोर्टलवर ६३ हजार ५९३ इतक्या नोकरीइच्छूक उमेदवारांनी नवीन नोंदणी किंवा पुनर्नोंदणी केली आहे. यात मुंबई विभागात २७ हजार २५२, नाशिक विभागात ६ हजार ६४४, पुणे विभागात ११ हजार ६८१, औरंगाबाद विभागात ९ हजार १६१, अमरावती विभागात ५ हजार ००९ तर नागपूर विभागात ३ हजार ८४६बेरोजगार उमेदवारांनी नोंदणी केली.
माहे सप्टेंबरमध्ये कौशल्य विकास विभागाच्या विविध उपक्रमांद्वारे ३२ हजार ९६९ उमेदवार नोकरीस लागले. यामध्ये मुंबई विभागात सर्वाधिक २० हजार ८०५, नाशिक विभागात २ हजार २४४, पुणे विभागात ४ हजार १८७, औरंगाबाद विभागात ३ हजार १२८, अमरावती विभागात १ हजार २९३ तर नागपूर विभागात १ हजार ३१२ इतके बेरोजगार उमेदवार नोकरीस लागले.
सप्टेंबरमध्ये १६ हजार जागांसाठी ऑनलाईन मुलाखती
कौशल्य विकास विभागाने लॉकडाऊनच्या काळात राज्यभरात पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्यांची मोठी मोहीम सुरु केली आहे. प्रत्येक जिल्हास्तरावर ऑनलाईन रोजगार मेळावे घेण्यात येत आहेत. एप्रिल ते सप्टेंबर महिन्यात १११ ऑनलाईन रोजगार मेळावे झाले. सप्टेंबरमध्ये झालेल्या ३५ मेळाव्यांमध्ये २३६ उद्योजकांनी सहभाग घेतला. त्यांच्याकडील १६ हजार ६८३ जागांसाठी त्यांनी व्हॉटस्अॅप, स्काईप, झूम अॅप आदींच्या सहायाने ऑनलाईन मुलाखती घेतल्या. या मेळाव्यांमध्ये ९ हजार ८५६ नोकरीइच्छूक तरुणांनी सहभाग घेतला. त्यापैकी आतापर्यंत ३ हजार ९३६ तरुणांना रोजगार मिळाला आहे. उर्वरित जागांसाठी उर्वरित तरुणांमधून निवड प्रक्रिया सुरु आहे. सर्व उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यासाठी विभागामार्फत प्रयत्न करण्यात येत आहेत, असे मंत्री श्री. मलिक यांनी सांगितले.
नोकरी इच्छूक तरुणांनी नोंदणी करण्याचे आवाहन
मंत्री श्री. मलिक म्हणाले की, यापुढील काळातही रोजगार उपलब्धतेसाठी विभागामार्फत मोहीम पातळीवर काम केले जाईल. नोकरीइच्छूक तरुणांनी https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी आणि आधार क्रमांकासह नोंदणी करावी. आधी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपली माहिती अद्ययावत करावी, तसेच कुशल उमेदवारांच्या शोधात असलेले खासगी, सार्वजनिक क्षेत्रातील उद्योजक, कॉर्पोरेट्स यांनीही या वेबपोर्टलवर नोंदणी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम