
परतीच्या पावसाने मुलुंड मधील अनेक रस्त्यांवर पाणी साचले
- by Adarsh Maharashtra
- Sep 23, 2020
- 1237 views
मुलुंड :(शेखर भोसले) आज दुपारी १ वाजल्यापासून मुलुंडमध्ये पुन्हा पावसाळा सुरुवात झाली. संध्याकाळच्या वेळेत पावसाचा जोर वाढल्याने मुलुंड पूर्व, पश्चिम येथील रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात झाल्याने पालिकेच्या रस्ता साफसफाईचे व नाला सफाईच्या कामाचे पुन्हा धिंडवडे निघाले.
मुलुंड पश्चिमेच्या काही सखल भागात १ फुटापर्यंत पाणी साचले होते. मुसळधार पाऊसामुळे रस्त्यावर साचलेले पाणी जाण्यासाठी गंगाराम मिरेकर चौकातील
रस्त्याच्या मधोमध असलेल्या एका ड्रेनेज चेंबरचे झाकण थोडे खुले करण्यात आल्यामुळे व्हीपी रोड व जेएन रोड जंक्शनवर साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांना व पादचाऱयांना मोठया अडचणीचा सामना करावा लागत होता. मुलुंड पूर्वेतील गव्हाणपाडा परिसरातील गावठाणात देखील मुसळधार पावसामुळे पाण्याच्या लाटा वाहताना दिसत होत्या. नवघर रोडवरील साईसदन इमारतीत साचलेल्या पाण्याला निचरा होण्यासाठी वाट न मिळाल्याने तेथे देखील एक फुटापर्यंत पाणी साचले होते.
काही कामचुकार पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांमुळे मुलुंडमधील रस्ते पूर्णतः साफ होत नाही आहे त्यामुळे हा कचरा हवेने रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात जातो तसेच नालेसफाईच्या वेळी नाल्यातून काढलेला गाळ कित्येक दिवस रस्त्यावर तसाच पडून राहतो त्यामुळे हा सुकलेला गाळ पुन्हा नाल्यात जाऊन बसतो परिणामी थोडा अधिक पाऊस झाला की नाले भरून वाहतात व ते पाणी रस्त्यावर येऊन रस्ते तुंबतात. संबंधित पालिका अधिकारी देखील योग्य प्रकारे रस्ते व नाले साफसफाई होत आहे की नाही हे पाहण्यासाठी त्यांच्या कार्यालायातून बाहेर पडतच नसल्यामुळे मुसळधार पाऊसात रस्त्यावर पाणी साचते व मुलुंड तुंबते अशी तिखट प्रतिक्रिया मुलुंड मधील विशाल कुलकर्णी यांनी दिली आहे.
यंदाच्या पावसाच्या आधी मुलुंड मधील मोठया नाल्यांची साफसफाई व्यवस्थित झाली नसल्यामुळे व नाल्यातील गाळ पूर्णतः काढला गेला नसल्यामुळे यंदाच्या पावसात मुलुंडमधील रस्ते अनेकवेळा तुंबल्याचे मुलुंडकरांनी पाहिले आहेत.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम