मोबाईल फोन लुटणाऱ्या व त्यांचे आएमईआय क्रंमाक बदलून त्यांची विक्री करणाऱ्या टोळीला अटक!

मुंबई दि.29 (जीवन तांबे)  मोटारसायकल वरुन भरधाव येऊन मोबाईल फोन लुटणाऱया व मोबाईल फोनची 5 ते 10 हजारात विक्री करणाऱया 6 जणांच्या टोळीला विक्रोळी पार्कसाईट पोलिसांनी जेरबंद केले आहे.  युसुफ हैदरअली शेख वय 24, नावेद नदीम शेख - 21, मोहमद अमीन शेख वय 46, इक्बाल नासीर खान - 32, सलमान अदील अहमद सिध्दीकी वय - 32,  व साबीर सलीम खान वय- 34 आरोपीचे नांव आहे.  या टोळीने वेगवेगळ्या ठिकाणावरुन लुटलेले व आयएमईआय क्रमांक बदललेले 48 महागडे मोबाईल फोन व इतर साहित्य जफ्त करण्यात आल्याची माहिती परिमंडळ-7चे पोलीस उपआयुक्त प्रशांत कदम यांनी दिली. या टोळीने गत दिड वर्षामध्ये लुटलेल्या शेकडो मोबाईल फोनचे आयएमईआय क्रमांक बदलून त्यांची विक्री केली असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.  

 या आरोपी मधील  युसुफ आणि नावेद हे दोघेही मोटारसायकलवरुन जाऊन रस्त्याने पायी जाणाऱया व्यक्तींच्या हातातील महागडे मोबाईल फोन लुटून नेत होते. त्यांनतर ते मोहम्मद शेख व इक्बाल खान या दोघांना लुटलेले मोबाईल फोन देत होते. त्यानंतर ते दोघे सलमान सिद्धीकी व साबीर खान या दोघांकडून लुटलेल्या मोबाईल फोन मधील आयएमईआय क्रमांक बदलून घेऊन सदर मोबाईल फोन 5 ते 10 हजारात विकत असल्याचे तपासात आढळुन आले आहे.  

गत 25 ऑगस्ट रोजी सकाळी युसुफ आणि नावेद या दोघांनी अशाच पद्धतीने घाटकोपर येथील नित्यानंद नगर मध्ये राहणाऱया मोहम्मद रिजवान युसुफ खान याचा 20 हजार रुपये किंमतीचा मोबाईल फोन लुटून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी मोहम्मद रिजवान याने आरडा-ओरड केल्यानंतर त्या भागात गस्तीवर असलेले पोलीस हवालदार कदम आणि पोलिस शिपाई रोकडे त्यांचा पाठलाग करुन प्रथम युसूफ शेख याला नंबर फ्लेट नसलेल्या मोटारसायकलसह पकडले होते. त्यानंतर त्याने दिलेल्या माहितीवरुन पोलिसांनी त्याचा पळून गेलेला साथिदार नावेद शेख याला मानखुर्द येथून ताब्यात घेतले होते. त्यानंतर पोलिसांनी दोघांची कसुन चौकशी केली असता, या दोघांनी  गत दिड वर्षामध्ये  चेंबुर,घाटकोपर,दादर,विक्रोळी,मुलुंड आदी भागातील अनेक नागरिकांचे मोबाईल फोन लुटल्याचे व त्यांचे आयईएमआय क्रमांक बदलून विकल्याची कबुली दिली.  

त्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक सावंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक भुजबळ, पोलीस उपनिरीक्षक शेळके व त्यांच्या पथकाने   मोहमद शेख व इक्बाल खान या दोघांना अटक केली. त्यानंतर पोलिसांनी सलमान अदील अहमद सिध्दीकी व साबीर सलीम खान यांच्या मानखुर्द शिवाजीनगर येथील मोबाईलच्या दुकानावर छापे टाकले असता सदर दुकानामध्ये जबरी चोरी करुन आणलेले व आयएमइआय क्रंमांक बदलण्यात आलेले वेगवेगळया कंपन्यांचे 48 महागडे मोबाईल फोन आढळुन आले. त्यामुळे पोलिसांनी सर्व मोबाईल फोन, तसेच हार्डडिस्क, दोन लॅपटाप, दोन मोटारसायकल जफ्त करुन सलमान सिद्धीकी व साबीर खान या दोघांना अटक केली. सलमान व साबीर हे दोघेही संगणकामधील एसपी टुल या सॉफ्टवेयरच्या सहाय्याने मोबाईल फोन मधील आयएमइआय कमांक बदलुन देत असल्याचे तपासात आढळुन आले आहे.  

अटक करण्यात आलेल्या आरोपीवर विकोळी,चेंबूर,शिवाजीनगर पोलीस ठाण्यात मोबाईल रॉबरीचे गुन्हे दाखल असून त्यांनी कोणकोणत्या ठिकाणाहुन मोबाईल फोन लुटले आहेत. तसेच किती मोबाईल फोनचे आयएमइआय कमांक बदलून त्यांची विक्री केली आहे, याबाबत अधिक चौकशी करण्यात येत असल्याचे आल्याची माहिती पोलीस उपआयुक्त प्रशांत कदम यांनी दिली.  

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट