रोहा तांबडी प्रकरणी आवश्यक चौकशी प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करणार गृहमंत्री अनिल देशमुख

अलिबाग,जि.रायगड (अनुज केसरकर) : रोहा तांबडी प्रकरणामध्ये आवश्यक ती चौकशी करून, जास्तीत जास्त पुरावे गोळा करून लवकरात लवकर परिपूर्ण आरोपपत्र दाखल केले जाईल, जेणेकरून आरोपींना जास्तीत जास्त कडक शिक्षा होईल, असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज येथे केले. 
    
मौजे तांबडी, तालुका रोहा येथील रणजित म्हांदळेकर यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख हे म्हांदळेकर  कुटुंबियांच्या घरी आले असताना बोलत होते.
     
यावेळी पालकमंत्री कु. आदिती तटकरे, खासदार सुनिल तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, माजी आमदार सुरेश लाड, पोलीस महानिरीक्षक निकीत कौशिक, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, प्रांताधिकारी डॉ.यशवंत माने, पोलीस उपअधीक्षक श्री. किरणकुमार सूर्यवंशी, तहसिलदार कविता जाधव उपस्थित होते.
       
यावेळी पुढे बोलताना गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, रोहा तांबडी येथील घटना ही निश्चितच  अत्यंत दुर्दैवी  घटना आहे. या प्रकरणाचा  तपास पूर्ण करुन लवकरात लवकर दोषारोपपत्र दाखल करण्यात येईल. हे प्रकरण जलदगती  न्यायालयात चालविण्यात येणार असून या खटल्यासाठी प्रख्यात ज्येष्ठ विधीज्ञ ॲड.उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

संबंधित पोस्ट