मंत्री असावा तर असा!आईच्या निधनानंतर अवघ्या 3 दिवसांत पुन्हा उतरले कोरोना युद्धात

सलाम! मातृनिधनाचं दुःख बाजूला सारून आरोग्यमंत्री राजेश टोपे कर्तव्यावर रुजू

मुंबई: राज्यावर सध्या करोनाचं संकट असल्याने आरोग्यमंत्री राजेश टोपे मातृनिधनाचं दुःख. बाजूला सारून पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले आहेत. दुःख कितीही मोठं असलं तरी केवळ तीन दिवसांचाच दुखवटा पाळण्याचा निर्णय टोपे कुटुंबाने घेतला. "मी माझ्या कार्यात रुजू होणं हीच मातोश्रींना खरी श्रद्धांजली ठरेल," अशी भावना राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने राजेश टोपे यांचे लोकांसोबत संवाद साधतानाचे फोटो ट्विट केले आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसने ट्विटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, "बुधवारी शरद पवार यांनी राज्याच्या एकूण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुंबईत चव्हाण सेंटरमध्ये पक्षाच्या सर्व मंत्र्यांची बैठक ठेवली होती राजेश टोपे या बैठकीला अनुपस्थित असणार असं सर्वांनी गृहित धरलं होतं. पण राजेश टोपे आवर्जून बैठकीला उपस्थित राहिले".

"मराठवाड्यात सर्वसामान्य घरात मर्तिका नंतर साधारणतः १४ दिवसांचा कठोर दुखवटा पाळण्याची पद्धत आहे.पण आपल्या मतदारसंघातील लोकभावना बाजूला सारून कर्तव्यपूर्ततेसाठी राजेश टोपे यांनी अवघ्या तीन दिवसांचा दुखवटा पाळून पुन्हा कार्यरत होणं हा मराठवाड्यातील जनतेसाठी एक नवा पायंडा आहे," असंही राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटलं आहे."या नव्या पायंड्यातून राजेश टोपे यांनी अनेक गोष्टी अधोरेखित केल्या.पुरोगामित्वाचे पुढचे पाऊल तर पडलेच, पण प्रसंगी वैयक्तिक भावनांना अव्हेरून मनावर दगड ठेवून लोकसेवेसाठी कसे समर्पित व्हावे हे सिद्ध केलं.जनतेप्रती असलेली निष्ठा व कर्तव्य दक्षता त्यांनी पुन्हा सिद्ध केली," असंही राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटलं आहे.

आरोग्यमंत्री टोपे यांच्या मातोश्री शारदाताई यांचे 1 ऑगस्ट रोजी रुग्णालयात उपचार सुरू असताना दीर्घ आजाराने निधन झाले. त्यानंतर त्यांच्यावर रविवारी जालना जिल्ह्यातील मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यासाठी देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या नियमावलीचे पालन करण्यात आले.टोपे कुटुंबियांचे जालन्यासह राज्यभर असलेले जिव्हाळ्याचे संबंध पाहता अंत्यसंस्कारासाठी मोठी गर्दी होईल हे लक्षात घेऊन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी फेसबुक, ट्विटरद्वारे अंत्यसंस्काराचे थेट प्रक्षेपण करण्याचा निर्णय घेतला. कोरोनामुळे अंत्यसंस्कारासाठी प्रत्यक्ष उपस्थित न राहता तिथूनच थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून अंत्यदर्शन घेण्याचे आणि आदरांजली अर्पण करण्याचे आवाहन त्यांनी केले होते.मार्चच्या सुरूवातीला जेव्हा राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळून यायला सुरूवात झाली नेमक्या त्या कसोटीच्या काळात आरोग्यमंत्र्यांच्या मातोश्री रुग्णालयात दाखल होत्या. कोरोनाच्या लढ्यात अग्रभागी असलेल्या आरोग्यमंत्र्यांना आईच्या भेटी पुरेसा वेळ मिळत नव्हता तरीही ते वेळात वेळ काढून आईला भेटायला जायचे.

मराठवाड्यातील ग्रामीण भागात आजही कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर 14 दिवसांचे सुतक पाळताना सदस्यांनी कामकाज न करता घरातच थांबण्याची प्रथा आहे. पूर्वी निरोप जायला वेळ लागायचा, दळणवळणाची साधने पुरेशी नसल्याने नातेवाईक यायलाही विलंब व्हायचा. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. आताच्या काळाशी तर्कसंगत निर्णय घेताना बदलाची सुरूवात स्वत: पासून करण्याचा संदेश समाजापुढे द्यायचा होता म्हणूनच आईच्या निधनानंतर 14 दिवसांचा दुखवटा न पाळता याकाळातील विधी तीन दिवसात केले, असे राजेश टोपे यांनी सांगितलं. जुन्या परंपरा ह्या आताच्या काळाशी सुसंगत असाव्यात समाजाचे नेतृत्व करणाऱ्यांनी बदलाचा पायंडा घालून दिला तर समाजप्रबोधनाला दिशा मिळते, असेही श्री. टोपे यांनी सांगितले.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट