कोकणसह मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस,आज दुपारी हाय टाईडचा इशारा;रेड अलर्ट जारी
तर थोडक्यात टळली दुर्घटना, दरड कोसळली आणि मारुतीची कार सापडली
- by Adarsh Maharashtra
- Aug 04, 2020
- 1711 views
मुंबई : कोकणसह मुंबईत रात्रीपासून जोरदार पाऊस कोसळत आहे.पावसाने मुंबईचे हाल केले आहेत.मुसळधार पावसामुळे मुंबई शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. काल रात्रीपासून शहरात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे हिंदमाता, दादर टी.टी. किंग्ज सर्कल, सायन, चेंबूर, अंधेरी, सांताक्रूझ आणि इतर सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. रस्ते वाहतुकीवरही मोठा परिणाम दिसून येत आहे.
मुंबई शहरातील कुलाबा शहरात एक वाजेपर्यंत सुमारे २६९ मिमी पावसाची नोंद झाली, तर सांताक्रूझ उपनगरी भागात ८७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सतत होत असलेल्या मुसळधार पावसामुळे हवामान खात्याने मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला असून येत्या २४ तासांत जोरदार मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली.
मुंबईव्यतिरिक्त ठाणे, पुणे, रायगड आणि महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यांसाठीही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस कालपासून सुरु आहे. रात्री भर वादळी वाऱ्यासह पाऊस कोसळत होता. दरम्यान, दुपारी १२.४५ वाजता मुंबईतही भरतीची (हाय टाइड) शक्यता आहे.
समुद्रात ४.५१ मीटर उंचीच्या लाटा येण्याची शक्यता आहे. लोकांना सावधनतेच्या इशारा देण्यात आला आहे. लोकांनी समुद्रात जाऊ नका तसेच समुद्राच्या किनाऱ्यापासून दूर रहाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
ऐकीकडे कोरोनाची सामना करणाऱ्या मुंबईकरांचे पावसामुळे हाल झाले आहे. मुंबईची लाईफलाइन असलेली लोकल सेवाही ठप्प झाली आहे. कांदिवली परिसरात भली मोठी दरड कोसळल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.
कांदिवलीत पश्चिम द्रुतगती महामार्गावर आज सकाळी दरड कोसळली आहे. टाईम्स ऑफिसच्या जवळ ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत सुदैवाने कोणती जीवितहानी झाली नाही. दरड कोसळल्यामुळे एका बाजूची वाहतूक ही बंद करण्यात आली आहे. महापालिका आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून दरड हटवण्याचे काम सुरू आहे.
लोकल सेवा ठप्प
अत्यावश्यक सेवा म्हणून सुरू असलेली लोकल सेवाही ठप्प झाली आहे.मध्य रेल्वे स्थानकावर सायन इथं ट्रॅकवर पाणी साचले आहे. तसंच परेल आणि सायन स्थानकात पाणी साचल्याने मध्य रेल्वे ठप्प झाली आहे. सीएसएमटी ते ठाणे वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर ठाणे ते कल्याण, कर्जत कसारा वाहतूक सुरू आहे. हार्बर मार्गावर वडाळा स्थानकात पाणी भरल्याने सीएसएमटी ते वाशी वाहतूक ठप्प झाली आहे. परंतु, वाशी ते पनवेल वाहतूक सुरू आहे.
घरातून बाहेर न पडण्याचे पालिकेचे आवाहन
दरम्यान, बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात रात्रीपासून सुरू असलेल्या संततधार पावसाच्या व भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कार्यालये, आस्थापना इत्यादी बंद ठेवण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगर पालिकेने केले आहे.त्याचबरोबर नागरिकांनी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून घरीच राहावे, असेही आवाहन बृहन्मुंबई महानगर पालिकेद्वारे करण्यात येत आहे.

रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम