
भाज्या, फळांच्या चढ्या भावातील विक्रीने मुलुंड, भांडूपकर हैराण
- by Adarsh Maharashtra
- Jul 03, 2020
- 1397 views
मुलुंड :(शेखर चंद्रकांत भोसले) लॉकडाऊन, वाढत्या कोरोना संख्येमुळे भाजी व फळ विक्रेत्यांना विक्री करण्यास असलेली मनाई तसेच सतत वाढत असलेल्या पेट्रोल, डिझेलच्या किंमती याचा फायदा घेत छुप्या पद्धतीने भाजी, फळे विकणाऱ्या किरकोळ विक्रेत्यांनी दरात भरमसाठ वाढ केली असल्याचे भांडूप, मुलुंडमध्ये सर्वत्र दिसून येत आहे. अधिकच्या फायद्यासाठी भाज्या, फळांचे दर भरमसाठ वाढवून कृत्रिमपणे महागाई निर्माण केलेल्या किरकोळ भाजी-फळ विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी येथील महिला वर्गांनी केली आहे.
मुलुंड, भांडूप परिसरातील वाढत्या कोरोना महामारीमुळे काही मोजकेच विक्रेते लपूनछपून भाजीपाला, फळ विकत असल्यामुळे याचा फायदा घेत भाज्या आणि फळांच्या दरात विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात वाढ केली असल्याचे आढळून आले आहे. घाऊक बाजारात आठ रूपये दराने असलेला विकला जाणारा कांदा किरकोळ बाजारात चाळीस रूपये किलो दराने विकला जात आहे. बटाटा २० रूपये प्रति किलो असताना ४० रूपये प्रतिकिलो दराने विक्री केली जात आहे. लसूण १८० रूपये प्रतिकिलो दराने तर नारळ ३५ ते ४० रूपये नग अश्या दुप्पट ते तिप्पट अधिक दराने भांडूप, मुलुंड मधील भाजीविक्रेते विकताना दिसून येत आहे. टोमॅटो ९० रूपये प्रतिकिलो, भेंडी १०० रूपये प्रतिकिलो, गवार १२० रूपये प्रतिकिलो, कोबी आणि फ्लॉवर ३५ रूपये पाव किलोने रस्त्यावरील भाजी विक्रेते विकताना दिसत आहेत. घाऊक बाजारापेक्षा हे दर खूपच अधिक असल्याचे आढळून आले आहे.
आयुश मंत्रालयाने रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी हळद आणि आलेचा वापर करण्याचे सुचविले असल्याने हळद, आले यांचे दर देखील किरकोळ विक्रेत्यांनी भरमसाठ वाढवून ठेवले असल्याचे आढळून आले आहे. भाजी विक्रेते आले १४० ते १५० रूपये किलो दराने विकत असून हळद २५० ते २७० रूपये किलोने विकत आहेत. तसेच फळांचे सेवन करणे देखील उपयुक्त असल्याने फळ देखील चढ्या भावाने किरकोळ विक्रेते विकत आहेत
भांडूपच्या एस आणि मुलुंडच्या टी वार्डात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने तसेच रुग्णांची संख्या देखील सातत्याने वाढत असल्याने स्थानिक प्रशासनाने भाजीपाला व फळ विक्रेत्यांना रस्त्यावर व पदपथावर धंदा लावण्यास मनाई केली आहे तरीही छुप्या पद्धतीने पालिकेच्या नजरेआड काही भाजीपाला, फळ विक्रेते धंदा करत असल्याचे सर्रास दिसून येत आहे. पालिकेची गाडी आली की तेवढ्यापुरते धंदे बाजूला करतात व गाडी गेल्यावर पुन्हा धंदा लावला जातो. पालिकेच्या अधिकाऱ्यांना हे सर्व प्रकार माहिती असतात परंतु बांधलेला हफ्ता वेळेवर मिळत असल्यामुळे त्यांच्याच आशीर्वादाने अनधिकृतपणे चालू असलेल्या या विक्रेत्यांकडे पालिका अधिकारी देखील दुर्लक्ष करतात.
अधिक मागणी असलेल्या भाज्यांचे दर, भाजीविक्रेत्यांनी वाढवून ठेवले असून कोरोना व लॉकडाऊनचा फायदा घेत सामान्य नागरिकांना अक्षरशः लुटले जात आहे त्यामुळे भाजी घेण्यासाठी जाणाऱ्या महिला वर्गांना एवढी महाग भाजी कशी घ्यायची हा प्रश्न पडतो. ५०० रूपयाची नोट ४ ते ५ भाज्या घेतल्या तरी संपून जाते. त्यामुळे खायचे काय हा प्रश्न प्रत्येक घरातील महिलांना पडलेला दिसून येत आहे. किरकोळ बाजारात भाज्या व फळांच्या भरमसाठ भाव वाढीने महिन्यांचे खर्चाचे गणित बिघडले असल्याचे भाजीमार्केट मध्ये खरेदीसाठी आलेल्या अनेक महिलांनी सांगितले असून प्रशासनाने चढ्या भावाने भाज्या व फळे विकणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम