
मुलुंडमधील रस्ते साफसफाईकडे टी वार्डच्या घन कचरा व्यवस्थापन अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष
- by Adarsh Maharashtra
- Jun 08, 2020
- 1140 views
मुलुंड :(शेखर चंद्रकांत भोसले) लॉकडाऊन व कोरोनाच्या भीतीने पालिकेचे बहुतेक सफाई कामगार अजूनही कामावर रुजू झाले नाही आहेत त्यामुळे मुलुंड मधील बहुतेक रस्त्यांवर स्वच्छतेचे तीन तेरा वाजलेले दिसत आहेत. रस्त्यांची नियमित साफसफाई होताना दिसत नाही आहे तर काही रस्ते अर्धवट साफ केले जाताना दिसत आहेत. लॉकडाऊनमध्ये शिथिलता आली तरी सफाई कामगार अद्याप लॉकडाऊनच्या वाता वरणातून बाहेर न आल्याने साफसफाईकडे सर्वत्र दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे त्यामुळे रस्त्यावर कचरा, झाडांचा पाला, पाचोळा, कुत्राची विष्ठा, इत्यादी सर्वदूर दिसत आहे.
नुकत्याच येवून गेलेल्या निसर्ग वादळामुळे सुटलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यात मुलुंडमधील अनेक झाडे उन्मळून पडली, काही झाडांच्या फांद्या तुटून पडल्या तर कित्येक झाडांची पाने रस्त्यावर इतस्ततः पडली आहेत त्यामुळे रस्ता अस्वच्छ झाला असून रस्त्यावर पडलेली ही घाण, कचरा अद्याप पालिकेच्या सफाई कामगारांकडून साफ करण्यात आलेला नाही आहे. हे वादळ येवून ५ दिवस होवून गेले तरीही मनुष्यबळ उपलब्ध नसल्याचे कारण पालिका अधिकाऱ्यांकडून पुढे केले जात असून सफाई कामगार कामावर रुजू झाले की रस्ता नियमित साफ केला जाईल असे टी वार्डच्या घन कचरा व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.
मुलुंडमधील बहुतेक रस्त्यांवर साफसफाई योग्य प्रकारे होत नसून लॉकडाऊनमध्ये शिथिलता आली तरी पालिकेचे कर्मचारी व अधिकारी रस्ते स्वच्छ व साफ करण्याकडे लक्षच देत नसल्याचे दिसून येत आहे. पडलेली झाडे अद्याप उचलून नेण्यात आली नाही आहेत, रस्त्याच्या कडेला, पदपथावर झाडाच्या फांद्या पडल्या आहेत त्या अद्याप उचलण्यात आलेल्या नाही आहेत, झाडांची पाने रस्त्यावर पडून रस्त्याला चिटकून बसली आहेत परंतु पालिकेचे सफाई कामगार अजूनही लॉकडाऊन मध्ये असून काम करण्याची ईच्छाच त्यांना होत नसल्याचे दिसत आहे. पालिका अधिकारीही रस्त्यावर फेरफटका मारून आपले सफाई कामगार नियमित रस्ता स्वच्छ करतात की नाही याची देखरेख करताना दिसत नाही आहेत. कोरोनाच्या भीतीने पालिकेच्या घन कचरा व्यवस्थापनाचे अधिकारी त्यांच्या केबिनच्या बाहेर पडत नाही आहेत त्यामुळे सफाई कामगार देखील मजा मारत आहेत व रस्ता साफ न करता फुकटचे दिवस भरत आहेत, असे सर्वत्र दिसून येत आहे.
"कोरोनाला रोखण्यासाठी सर्वत्र स्वच्छता राखा, स्वच्छतेचे नियम पाळा असे शासनातर्फे वारंवार आवाहन केले जात आहे परंतु पालिकेच्या टी वार्डचे घन कचरा व्यवस्थापनाचे अधिकारीच शासनाच्या या आदेशाला बासनात गुंडाळून ठेवत आहेत, त्यामुळे मुलुंडमधील सर्वच रस्त्यांवर घाण दिसत असून रोजच्यारोज साफसफाई होत नाही आहे हे दिसून येत आहे. सफाई कामगार काम करतात की नाही हे बघायला अधिकाऱ्यांना वेळच नसतो. त्यामुळे अश्या कामचुकार अधिकाऱ्यांवर व सफाई कामगारांवर कारवाई करण्यात यावी", अशी मागणी जेष्ठ नागरिक अनंत सावंत आणि सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत पवार यांनी केली आहे.
पालिकेच्या अधिकाऱ्यांशी यासंदर्भात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता समोरून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. परंतु लॉकडाऊन मध्ये शिथिलता आली तरी टी वार्डचे घन कचरा व्यवस्थापनाचे पालिका अधिकारी अजूनही लॉकडाऊनमध्येच वावरत आहेत की काय असा प्रश्न यानिमित्ताने पडला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार, नगरसेवकांनी रस्ते साफसफाई कडे लक्ष देणे गरजेचे झाले असून कामचुकार पालिका कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्याची आवश्यकता असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम