
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, जनसंघाचे नानाजी देशमुख, गायक भूपेन हजारिका यांना 'भारतरत्न'
- by Adarsh Maharashtra
- Jan 26, 2019
- 573 views
नवी दिल्ली- माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची देशाच्या सर्वोच्च भारत रत्न पुरस्कारासाठी मोदी सरकारने निवड केली आहे. त्याशिवाय भारतीय जनसंघाचे नेते नानाजी देशमुख आणि गायक भूपेन हाजारिका यांना मरणोत्तर हा पुरस्कार जाहीर झाला आहे. ७० व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या तिघांच्या भारत रत्नची घोषणा केली. लोकसभा निवडणुकांपूर्वी ८३ वर्षांच्या प्रणव यांन भारत रत्न देण्याचा निर्णय आश्चर्य जनक आहे. राष्ट्रपती होण्यापूर्वी ते सुमारे पाच दशके काँग्रेसमध्ये होते. मागील वर्षी नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात आयोजित कार्यक्रमातील त्यांच्या उपस्थितीवरून विवाद झाला होता. भारत रत्न जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट् केले की, प्रणवदा आमच्या काळातील उत्कृष्ट राजकीय नेते आहेत. त्यांनी अनेक दशके नि:स्वार्थ भावनेने न थकता देशसेवा केली आहे. राष्ट्राच्या विकासात त्यांची छाप आहे. हा पुरस्कार तीन वर्षांच्या अंतराने देण्यात येत आहे. या पूर्वी २०१५ मध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि बनारस विश्व विद्यापीठाचे संस्थापक स्वातंत्र सैनिक मदनमोहन मालवीय यांना हा पुरस्कार देण्यात आला होता.
पुरंदरे, कुकडे, कोल्हे दाम्पत्य, केंद्रे, कादर खान यांना पद्म पुरस्कार
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शुक्रवारी पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. लोकगीत गायिका तीजनबाई, शिवशाहीर ब. मो. ऊर्फ बाबासाहेब पुरंदरे, एल अँड टीचे अध्यक्ष अनिलकुमार नाईक तसेच जिबूतीचे राष्ट्रपती इस्माइल उमर गुलेह यांना पद्मविभूषण हा नागरी सन्मान जाहीर झाला आहे. तर, डॉ. अशोक कुकडे हे पद्मभूषण आणि सामाजिक कार्यकर्ते कोल्हे दाम्पत्यासह नाट्यदिग्दर्शक वामन केंद्रे, दिवंगत अभिनेते कादर खान, अभिनेता मनोज वाजपेयी हे पद्मश्री पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
यंदा कला, समाजकार्य, विज्ञान व अभियांत्रिकी, व्यापार व उद्योग, औषधशास्त्र, साहित्य व शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा आदी विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या एकूण ११३ जणांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यामध्ये चौघांना पद्मविभूषण हा नागरी सन्मान, तर १४ जणांना पद्मभूषण आणि ९५ जणांना पद्मश्री पुरस्कार दिले जाणार आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंजुरी दिल्यानंतर शुक्रवारी रात्री पद्म पुरस्कार सन्मानार्थींच्या नावांची घोषणा करण्यात आली. येत्या मार्च किंवा एप्रिल महिन्यात राष्ट्रपती भवनमध्ये होणाऱ्या शाही सोहळ्यात पद्म पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. यंदाच्या पद्म सन्मानार्थींमध्ये २१ महिला आणि एका तृतीयपंथीचा समावेश आहे.
पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केल्या जाणाऱ्यांमध्ये यंदा महाराष्ट्रातील नाट्य अभिनेते दिन्यार कॉन्ट्रॅक्टर, सुदाम काटे, गायक शंकर महादेवन, साहित्यिक नगीनदास संघवी, सामाजिक कार्यकर्ते शब्बीर सय्यद तसेच डॉ. रवींद्र कोल्हे व डॉ. स्मिता कोल्हे या दाम्पत्याचाही समावेश आहे. याव्यतिरिक्त अकाली दलाचे नेते सुखदेवसिंग धिंडसा (पद्मभूषण), माजी केंद्रीय मंत्री करिया मुंडा (पद्मभूषण), एस. नंबी नारायण (पद्मभूषण) दिवंगत पत्रकार-साहित्यिक कुलदीप नय्यर (पद्मभूषण), माजी कॅग व्ही. के. शुंगलु (पद्मभूषण), फूटबॉलपटू सुनील छेत्री (पद्मश्री), नृत्य दिग्दर्शक प्रभूदेवा (पद्मश्री), क्रिकेटपटू गौतम गंभीर (पद्मश्री), रोहिणी गोडबोले (पद्मश्री) यांचाही नागरी सन्मान जाहीर झाला आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम