मराठा आरक्षणावरील पुढील सुनावणी 1 सप्टेंबरला

नवी दिल्ली : मराठा आरक्षणासंबंधी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. मराठा समाजातील नेते आणि बांधवांकडे साखर कारखाने आहेत, समाजाने महाराष्ट्राला 10 हून अधिक मुख्यमंत्री दिले आहेत, असा युक्तिवाद सुनावणीदरम्यान याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून करण्यात आला. मराठा आरक्षणाचे प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. येत्या, 1 सप्टेंबरला पुढील सुनावणी घेण्यात येणार आहे.

शुक्रवारी पी. एस. पटवालिया, अभिषेक मनू सिंघवी यांनी राज्य सरकारची बाजू मांडली. त्यानंतर न्यायालयाने विरोधकांची बाजू ऐकून घेतली. याचिकाकर्ते गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयात युक्तिवाद केला.

एसटीला (अनुसूचित जाती) आरक्षण मिळाले, त्यावेळी आरक्षणाचा 50 टक्क्यांचा टप्पा ओलांडला नव्हता. एसटी समाज सर्वांत जास्त मागासवर्ग आहे, असा अहवाल सादर करण्यात आला आहे. राज्य सरकारकडून मागासवर्ग आधारावर मराठा समाजाला आरक्षण कसे देण्यात आले? असा सवाल सदावर्ते यांनी उपस्थित केला. मराठा समाजाचे राज्यात 10 पेक्षा जास्त मुख्यमंत्री झाले. अनेक मराठा समाजाच्या नेत्यांचा आणि लोकांचे साखर कारखाने आहेत. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देणे चुकीचे आहे, अशी भूमिका सदावर्ते यांनी खंडपीठा समक्ष मांडली.

मराठा समाजाच्या मतांचा फायदा बड्या राजकीय नेत्यांना झाला पाहिजे, यासाठी मराठा समाजाच्या नेत्यांची मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी चढाओढ सुरू आहे, असा युक्तीवाद सदावर्ते यांच्याकडून करण्यात आला. राज्य सरकारसह अनेक याचिकाकर्त्यांनी मराठा आरक्षणाची सुनावणी ईडब्ल्यूएसच्या सुनावणीसोबत पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग करावी, अशी विनंती केली आहे. दरम्यान, सर्व युक्तिवाद ऐकल्यानंतर सुप्रीम कोर्टाने याबाबतची पुढील सुनावणी येत्या मंगळवारी 1 सप्टेंबर रोजी होईल, असे स्पष्ट केले.

सर्वोच्च न्यायालयाने अजून निष्कर्ष काढला नाही. राज्य सरकारने 50 टक्के आरक्षण मर्यादा ओलांडून आरक्षण दिले आहे. त्याला कायदेशीर आधार आहे. हा विषय घटनापीठाकडे जावे ही राज्य सरकारची भूमिका आहे, असे मत राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. पुढील सुनावणी मराठा आरक्षणाचे प्रकरण घटनापीठाकडे जाणार की नाही? यासंबंधीची उत्सुकता आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट