Coronavirus :-चौथ्या मुंबईच्या दारावर कोरोनाची धडक

आतापर्यंत १६ रुग्ण, दररोजचा शेकडो कर्मचाऱ्यांचा मुंबई प्रवास धोक्याचा

बदलापूर :- राज्यात कोरोनाचा प्रवेश झाल्यानंतरही मुंबई, पुण्याशी रोज संपर्कात असलेल्या बदलापुरात पहिला कोरोना रुग्ण आढळण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागला होता. मात्र गेल्या १० दिवसांत करोना रुग्णांची संख्या १६ पर्यंत पोहोचली आहे. यातील एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यात मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि उपनगरात सेवा देण्यासाठी अडीच हजारांपेक्षा अधिक बदलापूरकर प्रवास करत असल्याने कोरोनाचा धोका अधिक आहे.बदलापूर शहरात दहा दिवसांपूर्वी अचानक आठ रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली होती. देशव्यापी टाळेबंदीत सातारा येथे प्रवास करून २४ मार्चला बदलापुरात परतलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील दोघांना कोरोनाची लागण झाली.

पुढे मुंबईच्या खाजगी रुग्णालयातील कोरोनाबाधित कर्मचाऱ्याने आपल्या बदलापुरातील बहिणीकडे आसरा घेतला. या दोन्ही कुटुंबातील इतर सदस्यांनाही लागण झाली. त्यानंतर बदलापुरात राहणारे आणि मुंबईतील केईएम रुग्णालयातील प्रयोगशाळा तंत्रज्ञ, शीव रुग्णालयात दाखल असलेला रुग्ण आणि आता सोमवारी मुंबई महापालिकेत सफाई कर्मचारी असणाऱ्या बदलापुरातील दोघांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने शहरातील रुग्णांची संख्या १६ वर पोहोचली आहे. यातील एका महिलेचा ३० मार्च रोजी मृत्यू झाला आहे. त्यामुळे अवघ्या काही दिवसात वाढलेल्या या रुग्णसंख्येमुळे बदलापुरात चिंतेचे वातावरण आहे. चौथी मुंबई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंबरनाथ आणि बदलापूर शहरात राज्याच्या तुलनेत पहिला रुग्ण आढळण्यासाठी एक महिना लोटावा लागला. देशव्यापी टाळेबंदी जाहीर होण्यापूर्वीपर्यंत या दोन्ही शहरातून कोरोनाचे केंद्र असलेल्या मुंबई आणि पुण्यात शेकडोच्या संख्येने नागरिक प्रवास करत होते. बदलापूर नगरपालिकेने काही दिवसांपूर्वी केलेल्या सर्वेक्षणात बदलापूर शहरातून मुंबई आणि उपनगरांमध्ये सेवा देण्यासाठी जाणाऱ्या कर्मचारी आणि आरोग्यसेवकांची संख्या अडीच हजारांच्या घरात असल्याचे समोर आले आहे. तर खाजगी वाहनांतून आणि दुचाकीवरून जाणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. तशीच संख्या अंबरनाथ शहराचीही असल्याची माहिती आहे. त्यामुळे हजारो कर्मचारी दररोज मुंबईत प्रवास करत असल्याने करोनाबाधितांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त होते आहे.बदलापुरात सध्याच्या घडीला नऊ रुग्ण हे मुंबईतील कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील आहेत. त्यामुळे भविष्यातील धोका टाळण्यासाठी योग्य पावले उचलण्याची मागणी होत आहे.

खबरदारी सुरूच मात्र..

मुंबई आणि उपनगरांतील विविध शहरांमध्ये सेवा देणारे कर्मचारी दररोज प्रवास करत असले तरी त्यांच्याकडून मोठय़ा प्रमाणावर आरोग्याची खबरदारी घेतली जात आहे. शासनाने दिलेल्या मार्गदर्शन तत्त्वांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. मात्र लक्षणे नसलेल्या रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय ठरत असल्याचे हे कर्मचारी खाजगीत सांगतात.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट